नवी दिल्ली – भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुम्ही दुसऱ्या राज्यात अथवा शहरात राहण्यासाठी गेला असेल तर, तुम्हाला शिधापत्रिकेत सुधारणा करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला मोफत रेशनचा लाभ मिळत राहील. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. रेशन कार्ड बनवण्यासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात. यासाठी अनेक कागद पत्रांची देखील आवशक्यता लागते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अर्जदाराला किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेतून जावं लागत.
मात्र, आता यापुढे किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेतून जावं लागणार नाही. कारण आता तुम्हाला एकाच दिवसात रेशन कार्ड हातात मिळणार आहे. उत्तराखंड सरकारने हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामांन्यांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. रेशन कार्डसाठी अर्जदाराला ठराविक काही दिवस प्रतिक्षा करावी लागते. शासनाकडून रेशन कार्ड ऑनलाईन प्रक्रियेनेही मिळवता येतं. मात्र हे वाटतं तितकं सोपं नाही, यासाठी देखील बराच वेळ जातो.
मात्र, या सर्व कटकटीतून आता सुटका होणार आहे. आता एका दिवसात रेशन कार्ड मिळणार आहे. अर्जासह आवश्यक कागदपत्र दिल्यानंतर अवघ्या काही तासात पडताळणीनंतर रेशन कार्ड दिलं जाईल. आवश्यक कागदपत्रात कमी असेल तर त्यावर उपाय शोधून दुसऱ्या दिवशी कार्ड बनवून दिलं जाईल. यानंतर रास्त भाव दुकानात मिळणाऱ्या शिधाचा लाभ घेता येईल. असा महत्वाचा निणर्य उत्तराखंड सरकारने घेतला आहे.
या कागदपत्रांची आवश्यकता असेल –
तुम्हाला अर्जदार/प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल. याशिवाय रहिवासी प्रमाणपत्रासाठी वीज बिल, पाणी बिल आणि मतदार ओळखपत्र देऊ शकता. याशिवाय जर घरात कोणी नवविवाहित जोडपे असेल तर, उदा. महिलेचे नाव तिच्या वडिलांच्या शिधापत्रिकेवरून काढून टाकल्याचे प्रमाणपत्र आणि विवाह नोंदणीचे प्रमाणपत्रही द्यावे लागणार आहे.