मुंबई – “कोविड योद्धा’ असलेल्या निवासी डॉक्टरांच्या पदव्युत्तर परीक्षांबाबत योग्य निर्णय घेण्यासंदर्भात अमित ठाकरे यांनी आज राजभवनाची वाट धरली. यावेळी त्यांनी राज्यपालांना विनंती पत्र दिले. दरम्यान, भाजपनंतर मनसेनेही राजभवनाची वाट धरल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
अमित ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. अमित ठाकरे म्हणाले, देशातील सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. या वैद्यकीय लढाईत सुमारे 2500 निवासी डॉक्टर्स दिवसरात्र रुग्णसेवा बजावत आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण (डिग्री आणि डिप्लोमा अंतिम वर्ष) घेणारे विद्यार्थी अर्थात निवासी डॉक्टर्स गेले अडीच-तीन महिने प्रचंड तणावाखाली आहेत. सुस्पष्ट धोरणाअभावी परीक्षेची टांगती तलवार त्यांना छळत आहे.
ही परीक्षा आता 15 जुलैपासून घेण्यात येणार आहे. हा निर्णय घेताना 24 तास रुग्णांसाठी उपलब्ध राहणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतांचा विचारही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केलेला नाही, असे अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
निवासी डॉक्टरांनी सुचवलेला पर्याय पत्रासोबत जोडत त्यांनी सुचवलेल्या पर्यायाची आपण गांभीर्याने दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
दरम्यान, याआधी “आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले होते.