चायनीज स्पिनच, काऊ-पी, चवळी किंवा चवळीची पानं आणि अमरनाथ लिव्हज अशा विविध नावांनी चवळीची भाजी ओळखली जाते. ही भाजी भारतात सर्वत्र ठिकाणी उपलब्ध आहे. याची पानं छोटी छोटी असतात. पराठा, सलाड, कढी यातही घातली जाते. परतवून किंवा कच्चीच खाल्ली जाते. उकडल्यावर तिची चव निघून जाते. दाणे, शेंगा, आणि पालेभाजी अशा विविध स्वरूपात ही भाजी खाल्ली जाते. या भाजीचे गुणधर्म जाणून घेऊयात.
काबरेहायड्रेट्स, प्रथिनं, जीवनसत्त्व के, बी ६, अ आणि क यांचा भरपूर साठा असतो. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी नैसर्गिक ऊर्जा या भाजीतून मिळते. मँगनीज, लोह, तांबं, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि फॉस्फरस असल्यामुळे शरीराला आवश्यक असणा-या खनिजांचा साठय़ाचं प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. फायबरचं प्रमाण उच्च असल्यामुळे पाचकशक्ती सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं.
ही भाजी वजन कमी करण्यास मदत करते. कारण यात असलेलं प्रोटिन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करण्यास मदत करते. तसंच शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अतिरिक्त वाढलेली चरबी कमी करण्यात मदत करते.
लालसर पानं असलेली चवळी रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्याचं काम करते.
अतिसारामुळे बेझार असलेल्या रुग्णांना ताज्या चवळीच्या पानांचा रस प्यायला दिल्याने आराम पडतो. ताज्या पानांचा नियमित रस प्यायल्याने केस गळणे किंवा अकाली पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते. कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारावर नियंत्रण मिळतं. म्हणूनच भरपूर प्रमाणात कॅल्शिअम मिळत असल्याने या भाजीचं आवर्जून सेवन करावं.
कॅन्सरपासून बचाव करण्याची क्षमतादेखील यात असते. दोन चमचे पानं एक कप पाण्यात दहा मिनिटं उकळून त्यानंतर त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडातील अल्सरचं किंवा घसा सुजणे यावर आराम पडतो. गरोदर महिलांनी याचं आवर्जून सेवन करावं. कारण गरोदरपणात होणारी कॅल्शिअमची झीज भरून काढते आणि बाळाची योग्य वाढ करते. प्रसूतीला त्रास होत नाही तसंच प्रसूतीनंतर मातेला भरपूर दूध येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.