पारनेर -तालुक्यातील वडुले येथील ग्रामसुरक्षा समितीने कामकाजात हलगर्जीपणा करून दिलेले काज योग्य रितीने पार पाडले नाही. त्यामुळे कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, असे नोटीस समितीतील सचिव व सदस्यांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी बजावली आहे.
वडुले येथे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा समिती गठित करण्यात आली होती. मात्र या समितीचे कामकाज योग्य रितीने पार पडत नसल्याने गावात नऊ मजूर आल्याची माहिती व तक्रार 3 मे रोजी मिळाल्यानंतर तहसीलदार देवरे तेथे गेल्या. मात्र तेथे या समितीतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक गैरहजर होते. नऊ मजूर हे रेडझोन असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथून आले होते.
मात्र ते आल्याची कोणतीही नोंद किंवा नोंदवही आढळून आली नाही. त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली नाही व ते मजूर रानामध्ये झोपलेले आढळून आले. याकडे करोना ग्रामसुरक्षा समितीने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यानंतर तहसीलदार देवरे यांनी या मजुरांना रात्री अकरा वाजता प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षामध्ये ठेवले आहे.
गावातीलच एका शेतकऱ्याने या व्यक्तींना जेवण दिले. मात्र ग्रामसुरक्षा समितीने नेमून दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली नाही. त्यामुळे मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना नोटिसा बजावल्या आहेत. या समितीने तालुक्यात बाहेरून येणारे मजूर, कारागीर, विद्यार्थी, पर्यटक यांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे होते. तसेच समितीच्या सदस्यांनी गावी पूर्णवेळ उपस्थित राहून त्याबाबत वेळोवेळी माहिती घेणे, विलगीकरण कक्ष स्थापन करणे, त्यामधील लोकांची आवश्यक ती व्यवस्था करणे, ही कामे समितीमार्फत पार पडणे आवश्यक होते. मात्र ग्रामसुरक्षा समितीने आदेशाचे उल्लंघन केले असून, ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई का करू नय,े याबाबत लेखी खुलासा ही नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत देण्यात यावा, असे नोटिशीत म्हटले आहे.