शिरूर (प्रतिनिधी) -करोनाचे आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिरूर शहरातील अनेक शाळांच्या बाहेर फळ्यांवर सुट्टीच्या नोटिसा लावून ठेवल्या. शाळाबंदीचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळा, कॉलेजकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले.
31 मार्चपर्यंत शाळा, अंगणवाडी, मंगल कार्यालय बंद असणार असून पुढील सूचना मिळेपर्यंत हे बंद असणार आहे. त्यामुळे सोमवार सकाळपासून शिरूर शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींची ये-जा
जाणवली नाही.
स्थानिक प्रशासन केव्हा गंभीर होणार?
शिरूर तालुक्यातील सर्वांत मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत रांजणगाव असून वसाहतींमध्ये हजारो कामगार पुणे व शिरूर आंबेगाव, हवेली, दौंड या तालुक्यांतून येत असतात. अहमदनगर जिल्ह्यातूनही काही कामगार येत आहेत. करोनाचा संसर्ग होऊ नये याबाबत खबरदारी घ्यावी. यासाठी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनाही सुट्ट्या देणे गरजेचे आहे. परंतु याबाबत शासन व स्थानिक पातळीवरील प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत नाही. या भागात एखादा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा प्रश्नही नागरिकांमधून विचारला जात आहे.
शिरूर शहर व तालुक्यात दुबई, ओमान, मस्तक या देशांतून आलेले 12 नागरिक आलेले असून अद्याप एकही करोना व्हायरसचा रुग्ण सापडला नाही. हे प्रवाशी आरोग्य विभागाच्या निगराणी खाली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
राजेंद्र शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी