सुट्ट्या रद्द : रेल्वे महसुलातही घट, सुरक्षिततेवर दिला जातोय भर
पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून जगभरात थैमान घालणारा करोना व्हायरस भारतात दाखल झाला झाला आहे. देशभरात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात आढळले आहे. “करोना’चा फटका पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) व रेल्वेला बसत आहे. दिवसाला सुमारे दीड कोटी उत्पन्न असणाऱ्या “पीएमपी’ला दिवसाला पन्नास लाखांचा फटका बसत असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून मिळाली आहे. त्याचप्रमाणे रेल्वेतील प्रवाशांची देखील संख्या घटली आहे.
पुणे व पिंपरी -चिंचवड शहरातील शाळा, कॉलेज, चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे टाळले आहे. याचा थेट परिणाम “पीएमपी’च्या महसूलावर झाला आहे. दिवसाला 1 कोटी 60 लाख रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या “पीएमपी’च्या उत्पन्नात दिवसाला 50 लाखांने घट झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात एकूण दीड हजार बसेस धावतात. मुख्य अडचण म्हणजे करोना आजारामुळे गर्दी वाढू नये, यासाठी प्रवासी कमी म्हणून फेऱ्या सुद्धा रद्द करता येत नाहीत. यामुळे नुकतीच सावरत असलेल्या पीएमपीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
“करोना’वर नियंत्रण मिळे पर्यंत तरी, अशीच स्थिती राहणार असून यासाठी पीएमपी प्रशासनाकडून “करोना’बद्दल जनजागृती केली जात आहे. चालक व वाहक दिवसभर हजारो प्रवाशांच्या थेट संपर्कात येत असल्याने त्यांना मास्क वाटप करण्यात आले आहेत. तर, जोपर्यंत करोनाचा परिणाम कमी होत नाही, तोपर्यंत अधिकारी वर्गांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय पीएमपी अध्यक्ष नयना गुंडे यांनी रविवारी (दि. 15) आगार प्रमुखांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत घेतला आहे. तर, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांनी घटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे स्टेशनवर फ्लेक्स, चित्रफीत व ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तर, रेल्वे प्रशासनाने रेल्वे कर्मचारी यांना मास्क व सॅनिटाझर वाटप केले असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
रेल्वे डब्याची साफसफाई सुरु
करोनानाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी रेल्वे टब्यातील टॉयलेट, खुर्च्या व प्रवासी संपर्कात येत असलेल्या ठिकाणी फवारणी करण्यात येत असून वातानुकूलीत डब्यातील ब्लॅन्केट, उषी व अन्य साहीत्य काढून घेण्यात आले आहे. प्रवाशांनी आपले साहित्य स्वत: आणण्याचे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपी बसेस रद्द करण्यात आल्या नाही. बसेसमध्ये प्रवासी संख्या कमी आहे. फेऱ्या रद्द केल्यास बसमध्ये प्रवासी संख्या वाढून गर्दी होऊ शकते, यामुळे कोणत्याही फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या नाहीत. दोन्ही शहरातील 13 आगाराचा दिवसाचा महसूल सुमारे 1 कोटी 60 लाखांपर्यंत होता मात्र, गेल्या चार दिवसांपासून दिवसाला 50 लाखांचा महसूल कमी केला आहे. चालक-वाहकांना मास्क दिले आहेत. पीएमपी कर्मचाऱ्यास आजारी पडल्यास तात्काळ सुट्टी देण्याची तरतूद करण्याचा निर्णय झाला आहे.
– आनंद वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी