पुणे – राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीबाबत उच्च न्यायालयात दाखल झालेल्या 30 याचिकांमुळे अडसर निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून पोर्टलवर भरती प्रक्रियेबाबत काहीच सूचना प्रसिद्ध झालेल्या नाहीत. उमेदवारांचे मात्र भरतीकडे लक्ष लागले आहे.
राज्यात पारदर्शकपणे शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले. पहिल्या टप्प्यात 12 हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा मागील सरकारने केली होती. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली खास अधिकाऱ्यांच्या टीमने विविध अडथळे पार करत भरती प्रक्रिया राबविण्यासाठी सतत कामकाज सुरूच ठेवले आहे. भरती प्रक्रितील काही टप्पे पूर्ण झाले असून यात कोणालाही एक रुपयाही न देता बऱ्याचशा उमेदवारांना शाळांमध्ये शिक्षकाची नोकरीही मिळाली. ही आनंददायी बाब म्हणावी लागणार आहे.
काही उमेदवारांना नोकरीत स्थान न मिळाल्यामुळे न्याय मिळावा यासाठी विविध कारणे उपस्थित करून नागपूर व औरंगाबादच्या खंडपीठात याचिका दाखल केलेल्या आहेत. समांतर आरक्षण, ब्रीज कोर्स, टीईटी परीक्षा याबाबत याचिकांद्वारे काही मुद्दे उपस्थित केले आहेत. न्यायालयाने दाखल झालेल्या याचिकांवर अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेचे टप्पे पुढे सरकत नाहीत.
न्यायालयाच्या निर्णयानुसार व शासनाच्याच्या आदेशानुसारच भरती प्रक्रिया पुढे नेण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. मार्च अखेर सर्व भरती प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचे नियोजनही कोलमडले आहे.
माजी सैनिकांच्या जागा भरण्यासाठीच्या प्रक्रियेचे नियोजन
आता माजी सैनिकांच्या 1 हजार 200 जागा भरण्यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबतच्या सूचना पोर्टलवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. खासगी संस्थांमध्ये मुलाखतीसह 3 हजार जागा भरण्यात येणार आहेत. यात द्वितीय श्रेणीत गुण मिळविलेल्या उमेदवारांनाची संधी मिळणार असून यांना शाळांचे प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी येत्या आठवड्याभरात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखतीची यादी प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेसाठी एप्रिल महिना उजाडणार आहे, हे निश्चित आहे.