पुणे – झाड आपल्याला ऑक्सिजन देते. त्यामुळे आई आणि झाड यापेक्षा मोठे काही नाही. कोणताही राजकीय नेता, नट किंवा शास्त्रज्ञ सावली देत नाही किंवा फळही देत नाही. त्यामुळे माझ्या मते झाड हा खरा सेलिब्रिटी आहे. राजकारणात कितीही पक्ष आले तरी आपण झाडांच्या पक्षावर प्रेम करूया कारण झाडांचा पक्ष टिकणारा आहे, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीच्या वतीने यंदाच्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला “समर्पण पुरस्कार’ शिंदे यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे उच्च आणि तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीचे राजेश पांडे, ऍड. मंदार जोशी, बाळासाहेब जानराव, सुनील महाजन, मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
“मी कॉलेजात असताना नाइट वॉचमनची नोकरी करायचो. तेव्हा नामदेव ढसाळ आणि दया पवार यांच्या कविता मला तोंडापाठ होत्या. तेव्हा झाडेसुद्धा खूप होती. मात्र, आता तीच दिसत नाहीत. फक्त ओसाड माळरान आणि लांब रस्ते दिसतात. आपण पुढच्या पिढीला काय देणार? म्हणून आम्ही “सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून वृक्षारोपणाला सुरुवात केली. सध्या छत्रपती संभाजीनगर येथे झाडांच्या पुनःरोपणाचे काम सुरू आहे,’ अशी माहिती शिंदे यांनी दिली.
सयाजी शिंदे यांच्या वृक्षारोपणाच्या कामाला हातभार म्हणून आम्ही गुवाहाटी आयआयटी, आसामच्या धर्तीवर पुण्यात पहिली “ट्री ऍम्ब्युलेन्स’ सुरू करणार आहोत, असे पाटील म्हणाले. तसेच “सह्याद्री देवराई’ संस्थेवर एक फिल्म बनवणार असल्याचेही जाहीर केले.
वृक्ष जसे जास्त दिवस जगतात तसे आपण जगले पाहिजे. पूर्वी भरपूर झाडे होती मुबलक ऑक्सिजन होता. त्यामुळे माणसे जास्त दिवस जगायची. मात्र आता व्हेंटिलेटरच्या ऑक्सिजनची गरज लागते. डॉ. आंबेडकरांनी शिकवले आहे की पक्ष, जात, धर्म, पंथापेक्षा देश महत्वाचा आहे, अन् देश वाचवायचा असेल तर झाडे वाचवली पाहिजेत, असे आठवले म्हणाले. डॉ. मोरे, पांडे, जानराव यांनी मनोगत व्यक्त केले. ऍड. जोशी यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले; आभार सुनील महाजन यांनी मानले.