मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर टीका करत लवकरच हे सरकार पडेल असे सूतोवाच केले आहे. दरम्यान, हे करत असताना राऊत यांनी शिंदे गटाविषयी एक महत्वपूर्ण वक्तव्य केले असून त्यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांनी थेट शिंदे गट फुटणार असल्याचं भाष्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
“कोणता गट काय मतं व्यक्त करतो त्यात मला पडायचं नाही. पण महाराष्ट्रात मध्यावधीची तयारी सुरू झाली आहे. जे म्हणतात हा आमच्याबरोबर आहे, तो आमच्याबरोबर आहे, त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो हे लक्षात घ्या, असे विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
अमोल कीर्तिकर यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना संजय राऊत यांनी शिंदे गटात मोठी फूट पडणार असल्याचं भाकीत केलं आहे. अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबत आहे. ठिक आहे, गजाभाऊंनी एक निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयासोबत अमोल नाहीत. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. याचा आम्हाला आनंद आहे, असे संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले,”अमोल कीर्तिकर आमच्यासोबत आहेत, याचा निर्णय मोठा आहे. माझ्या शब्दात सांगायचं म्हणजे 100 दिवसानंतर तुरुंगातून सुटल्यावर मला जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षा अधिक मला अमोल भेटायला आला,तो पक्षासोबत आहे. त्याने वडिलांना समजावण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्याचा आनंद आहे”, असेही त्यांनी सांगितले.
तसेच अमोल सारख्या कडवट लोकांमुळेच शिवसेनेचा पुढचा प्रवाह जाणार आहे. असे असंख्य अमोल कीर्तिकर आहेत. सूरज चव्हाण आहेत, आम्ही आहोत, तरुण मुलं आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र काम सुरू आहे. आदित्य ठाकरे फिरत आहेत. उद्धव ठाकरे फिरणार आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना वाढणार आहे, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.