मुंबई : राज्यातील बंडानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. दरम्यान, याच बंडानंतर विरोधकांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर वेळोवेळो टीका केली आहे. अशातच “शिंदे गटातील आमदार जास्त काळ समाधानी राहू शकणार नाहीत हे आम्हाला माहीत होते, असं वक्तव्य शिवसेना उपनेते भास्कर जाधव यांनी केले.
उद्धव ठाकरेंना सत्तेवरुन खाली आणण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नसल्यानं त्यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडल्याचा आरोप देखील यावेळी जाधव यांनी केला. पण हे 40 आमदार सुद्धा स्थिर राहू नये, यासाठी स्वत: भाजप प्रयत्न करत आहे. भाजपच शिंदे गटाला सुरुंग लावणार असा थेट आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते भास्कर जाधव यांनी नालासोपारात कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अनेक विषयांवरुन सरकारवर टीका केली. ठाकरे गटातून फुटलेल्या आमदारांत सुरु असलेली नाराजगी, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रसेखर बावनकुळे यांनी शिंदे-फडणवीस या दोघांना संताजी धनाजीची दिलेली उपाधी, यासह गजानन किर्तिकारांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश यावरही त्यांनी कडाडून टीका केली.
जे जे भाजपात गेले ते सर्व क्लिन झाले आहेत. जे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्या विरोधात आहेत ते चरित्रहीन आहेत. त्याच लोकांनी जर त्यांना सपोर्ट केला किंवा भाजपात गेले तर ते चारित्र्य संपन्न होतात. त्याच संस्कारातून चित्राताई बोलल्या असल्याचे जाधव म्हणाले. शिवसेनेत असणारे संजय राठोड यांचे प्रकरण भाजपाच्या चित्रा वाघ यांनी फार टोकाचे लावून धरले होते. पण आता त्याच म्हणाल्या की आपण आता विषय संपवूया. चिञा वाघ यांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण त्यांनी मला दम दिलाय की माझ्याबाबत बोलू नका म्हणून असेही जाधव म्हणाले. भाजपकडे कोणती मशीन आहे माहीत नाही, पण त्यांच्या मशीनमध्ये ED ची पावडर असावी असा टोलाही त्यांनी मारला आहे.