विठ्ठल वळसे-पाटील
उन्हाळ्याची चाहुल लागल्यानंतर जंगलामध्ये वणवे लागतात. दरवर्षी घडणाऱ्या वणव्यांवर यावर्षी काहीतरी उपाययोजना अवश्य राबविल्या पाहिजेत.
हवामानाचे बदलते स्वरूप, वाढते तापमान अशा नैसर्गिक आपत्तींमुळे लागणारी आग व मुद्दामहून लावलेली आग ही केवळ त्या ठिकाणच्या जंगलाचा किंवा टेकडीचा नाश करत नाही, तर त्याचे दूरगामी दुष्परिणाम पर्यावरणावर होत असतात. जंगलांना लागणारे वणवे, त्यातून होणारे पर्यावरणाचे नुकसान हे लोकांसमोर मांडले तर जंगल वाचवण्यासाठी लोकसहभाग निर्माण होईल.
भारत हा उष्ण कटिबंधीय प्रदेशात आहे. जानेवारी अखेर उन्हाच्या झळा लागू लागल्याने जंगल, वन, डोंगर, टेकडी यांच्या माथ्यावरील वाढलेले गवत व इतर लहान झुडपे वाळतात. त्यामुळे अनैसर्गिक व नैसर्गिकरीत्या वणवे लागून अनेक जंगले, त्यातील अनेक उपयुक्त वनस्पती, औषधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पती, पशु, पक्षी, कीटक नष्ट होत असतात. त्यांच्या हक्काचे घरटे नाहीसे होत असते.
वने हळूहळू नष्ट होऊ लागल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. प्राणवायूचे महत्त्व प्रत्येक राष्ट्राने ओळखून समृद्ध वने निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील पितेझरी नागझिरा वनपरिक्षेत्रात अचानक लागलेल्या आगीत उंच टेकडीवर आगीने वेढा दिल्याने मजुरांना खाली येता आले नव्हते. 2019 मधये ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेली आग सर्वात मोठी आग होती. अनेक दिवस हे अग्निकांड सुरू होते. यात जवळपास 50 कोटी प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला. याबद्दल जगाने हळहळ व्यक्त केली. या परिस्थितीचे वास्तव लोकांसमोर ठेवले पाहिजे. त्यातूनच जनतेच्या मनात जंगलांविषयी प्रेमभावना निर्माण होईल. आपली वसुंधरा समृद्ध ठेवायची असेल तर आपणास वणवा व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी एकटा वनविभाग काही करू शकणार नाही. लोकसहभाग फार महत्त्वाचा आहे.
जंगल, डोंगर, टेकडीच्या परिसरास जानेवारी महिन्यानंतर अचानक रात्रीच्या वेळी जंगलांना आग लागत असते. नैसर्गिकरीत्या आग ही दिवसाला लागत असते, परंतु रात्रीच्या वेळी लागणाऱ्या आगी या जवळपास मानवाच्या हातूनच लागत असण्याची दाट शक्यता आहे. अनेकदा जंगलात पार्टी करणारे महाभाग असाच वणवा लावून जात असतात. अशा उपद्रवी लोकांना वणवा लावल्याबद्दल कठोर शिक्षा दिली तर पुन्हा अशा वणव्याला सामोरे जावे लागणार नाही व समृद्ध जंगल निर्माण होण्यास हातभार लागेल.
काही वर्षांपूर्वी निसर्ग विविधतेने नटलेला होता. समाधानकारक पर्जन्यमान होते. उष्णकटिबंध प्रदेशामुळे जैवविविधता मुबलक प्रमाणात होती. वन्यजीव समृद्ध होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विकसाच्या नावाखाली रस्ते, खाण व औद्योगीकरण यासाठी वृक्षतोड केली गेली. यामुळे अनेक जैवविविधतेचा ऱ्हास होत गेला. निसर्गाच्या सौंदर्याला नख लावण्याचा डाव सुरू झाला. देशी वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष झाल्याने आगीत अनेक देशी वृक्ष संपदा कायमची नष्ट झाली. त्यामुळे दिवसेंदिवस अवेळी पाऊस व पर्जन्य घट मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या वणव्यांना सुरुवात होत असून त्यामुळे वणवा मुक्त गाव करण्यासाठी जंगलांच्या विषयीचे महत्त्व स्थानिकांना पटवून देणे क्रमप्राप्त आहे.
वणवा लागण्याबाबत अनेक लोकांत व डोंगरदऱ्यात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये गैरसमज असतात. ते अनेक वर्षानुवर्षे तसेच आहेत. डोंगर भागात दैवीशक्तीमुळे आग लागते. आग लागल्याने नवीन गवत, कुरण चांगले वाढते. हिरवळ मोठ्या प्रमाणात वाढते. झाडांना चांगली पालवी फुटते. पुढील हंगामात तेंदूच्या पानांचा आकार वाढावा म्हणून गडचिरोलीसारख्या भागात कृत्रिम वणवे लावतात. जंगलात वावरणे व शिकार करणे सोपे जाते. अशा काही भाकड कारणांमुळे जंगलामधील नव्याने उगवण झालेली झाडे, झुडपे, पक्ष्यांची घरटे, अंडी, नवजात पिल्ले, सरपटणारे प्राणी जळून खाक होतात. यावर या लोकांचे प्रबोधन करणे हाच एकमेव पर्याय आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांनाही दरवर्षी आगी लागण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातून अनेक वृक्षसंपदा व पशू, पक्षी, कीटक यांचे अस्तित्वच नष्ट झाले आहे.
शेत बांधावरील गवतकाडी पेटवताना जंगलाला आग लागते. जंगलात, डोंगरदऱ्यात फिरताना टेंभे घेऊन फिरणे अशा अनेक कारणाने जंगलात आगी लागतात. यासाठी वन विभागाने जंगलात व डोंगर भागात सहा मीटरपेक्षा जाळपट्टे काढलेले असतात. आग निरीक्षणासाठी मनोरा उभा केला जातो. आग निदर्शनास आल्यास वनविभागाचे महत्त्वाचे नंबर असलेले फलक लावले जातात. तळी, तलाव व पाणवठे निर्माण करणे आवश्यक आहे. संभाव्य आग विझवण्यास जंगलातील पाणीसाठा कामी आला पाहिजे. फेब्रुवारी सुरुवातीस फायर प्रोटेक्शनची कामे केलेली असतात. हे महत्त्वाच्या जंगलांबाबतच घडते. परंतु डोंगर, टेकडी भागांकडे दुर्लक्ष होते.
वनक्षेत्रात अनेक प्रकारे अतिक्रमण झाले आहे. अमेझॉनच्या वनांना जगाचं फुफ्फुस या नावाने ओळखलं जातं.
या जंगलांना आगी लागणे म्हणजे मानवी अस्तित्वाची घटिका भरण्यासारखे आहे. नैसर्गिकरित्या जंगलाला लागणाऱ्या आगीच्या प्रमाणापेक्षा मानवनिर्मित आगीचे प्रमाण अधिक आहे. वाऱ्याचा वेग व वाळलेली झाडे, झुडपे व गवत यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण होते. त्यासाठी आधीच वणव्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. गाव पातळीवर अनेक कार्य हे लोकसहभागातून होत असतात. असेच पर्यावरणाचे कार्य लोकसहभागातून होणे अपेक्षित आहे. समृद्ध वन प्रकल्पात प्रत्येक गावाचा, नागरिकाचा सहभाग असावा, त्यांची वन समिती स्थापित करून वनाबाबत जनजागृतीतून व्यवस्थापनाचे धडे दिले पाहिजेत. निसर्ग प्रेम हे बोलण्यातून नको, तर ते कृतीतून उतरले पाहिजे.