– हेमंत महाजन
नशेत गुंग असणार्या दोन तरुणींचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. अंमलीपदार्थांचा विळखा किती घट्ट होत चालला आहे याचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल.
मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात गांजा, कोकेन, चरस, मेफेड्रोन या अंमलीपदार्थ विक्रीचे हजारो किलो व कोट्यवधी रुपयांचे साठे पकडण्यात आले आहेत. ‘डीआरआय’च्या पथकाने ऑक्टोबरमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात कारवाई करून तब्बल 23 किलो कोकेन, 7.4 किलो मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाइन आणि 9.3 किलो मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण असा साठा आणि 30 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
या कारवाईत जप्त केलेल्या अंमलीपदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे बाजारमूल्य हे 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रायगड जिल्ह्यात पोलिसांनी गतवर्षी आठ हजार कोटी रुपयांचा गांजा, 219 किलो चरस आणि 314 किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. या प्रकरणात 18 गुन्हे दाखल करून 23 जणांना अटक झाली. जिल्ह्यातून परदेशातही अंमलीपदार्थांची तस्करी सुरू झाल्याची बाब समोर आली आहे.
ट्रकच्या कंटेनरमध्ये वेगळा कप्पा करून छुप्या पद्धतीने गांजाची तस्करी करणार्या टोळीला पकडण्याची कामगिरी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच केली आहे. मुंबई पोलिसांनी 2023 मध्ये 1319 गुन्ह्यांमध्ये एकूण 437 कोटी 98 लाख रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त केले. या प्रकरणात 1718 आरोपींना अटक करण्यात आली. वर्षभरातील कारवाईत साडेसात कोटी रुपयांचा गांजा, 50 लाखांचे कोकेन, 10 कोटींचे चरस, चार कोटी 21 लाख रुपयांचे हेरॉइन आणि इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील वडवली खाडीकिनारी आयोजित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून डीजेच्या तालावर नशेत झिंगणार्या 95 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व तरुण-तरुणी 18 ते 25 वयोगटांतील होते. आजची तरुण पिढी अंमलीपदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अंमलीपदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अंमलीपदार्थांचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो. प्रत्येकाने काय करावे यावर, विचार करण्याची वेळ आली आहे.
संयुक्त कारवाई
28 फेब्रुवारी 2024 रोजी गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलाने संयुक्त कारवाई केली. पुन्हा एकदा मोठा ड्रग्जचा साठा, 3,300 किलो वजनाचे हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलाने ही संयुक्त कारवाई केली.
25 फेबुवारी 2024 रोजी 2000 कोटी रुपयांची अंमलीपदार्थांची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त केली गेली.
नशेच्या दरीत तरुण पिढी
तरुण पिढी नशेच्या दरीत पडत असेल, तर उद्या देश अंधःकाराच्या खाईत जायला वेळ लागणार नाही. आज भारत विकसित होण्याचे स्वप्न पहात असताना अशा प्रकारे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात नशेखोर झाली, तर तरुण पिढीचे भवितव्य नसणारा ‘भोगवादी देश’ म्हणून भारताची ओळख होईल, अशी भीती आहे. शाळेपासून महाविद्यालयांपर्यंत होणारे अंमलीपदार्थांचे सेवन, तसेच विविध अंमलीपदार्थांची पुण्यात सहज होणारी उपलब्धता ही चिंतेची गोष्ट आहे. अंमलीपदार्थांच्या या लाटेत तरुण पिढी वाहून जात आहे.
तरुण पिढीला शारीरिक, मानसिकदृष्ट्या अधू बनवणार्या अंमलीपदार्थांच्या सेवनामुळे समाजात गुन्हे वाढतात. तरुण पिढी वाईट मार्गाला लागते. अंमलीपदार्थांच्या वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होतो. कोट्यवधी रुपयांचा चोरटा बाजार असलेला अंमलीपदार्थांचा व्यवसाय संपूर्ण जगात एक प्रकारे समांतर अर्थव्यवस्थाच चालवतो. अंमलीपदार्थांच्या तस्करीचा पैसा जगभरात आतंकवादासाठी वापरला जात आहे.
कडक भूमिका घ्यावी
सरकारने अन्वेषण यंत्रणांना मोकळीक द्यायला हवी. अन्वेषणात राजकीय हस्तक्षेप होऊ न देता पोलिसांनीही या प्रकरणी कडक भूमिका घेतल्यास, तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अंमलीपदार्थांचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो. देशोधडीला लावणारे हे अंमलीपदार्थ नेमके काय आहेत, त्याचे धोके कोणते याची माहिती प्रत्येक तरुणाला असलीच पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून ती ड्रग्जच्या आहारी जाणार नाहीत.
अंमलीपदार्थांच्या तस्करीला वेगवेगळे कंगोरे आहेत. आता जेवढी माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे, ती फक्त हिमनगाचा वरचा भाग आहे. याच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या विभागाने एकत्रित तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक घटकांनी केवळ पाठीला पाठ लावून नाही, तर खांद्याला खांदे लावून समन्वयाने एक विचाराने तपास करणे आवश्यक आहे. थोडक्यात, अंमली दहशतवाद थांबवायचा असेल, तर बहुआयामी अभियानाची गरज आहे.