आज सर्वत्र चीनबद्दल जनमत प्रतिकूल आहे. श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान या देशांत चीनने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. म्यानमार व बांगलादेशशीही तो जवळीक साधत आहे. अशावेळी भारताने चिनी डावपेच हाणून पाडण्यासाठी परराष्ट्रनीतीचा चतुराईने वापर करावा, ही योग्यच गोष्ट आहे.
“जगात सध्या सर्वजण चिंतेत आहेत. कधी कधी दुःख व निराशेचा भाव दिसतो. अशावेळी भगवान बुद्धांची शिकवण अधिक प्रासंगिक ठरते’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त काढले. संकटकाळात जगातील अनेक देशांना भारताची आठवण झाली. आज आपले प्रत्येक भारतीयाचे जीवन वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचवेळी वैश्विक उत्तरदायित्वाचेही पालन आपण करत आहोत. भारताची प्रगती जगाच्या प्रगतीला सहाय्यभूत ठरेल, असे प्रतिपादनही मोदी यांनी केले.
वास्तविक करोनावरून जगात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. चीनने करोनासाथीत बळी पडलेल्यांचा सांगितलेला आकडा चुकीचा असून, त्या देशातच जगातील सर्वाधिक बळी गेले आहेत. चीन हेतुपुरस्सर मृतांचा आकडा लपवत आहे, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चीनने जर हेतुपुरस्सर हा विषाणू पसरवल्याचे सिद्ध झाले, तर त्याने गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, अशी उघड धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमॉक्रटिक पक्षाचे झोपाळू जोए बायडेन निवडून यावेत, यासाठी चीन धडपड करत आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेपच करत आहे, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. याउलट कोविड-19 बाबत चीनवर आरोप करण्यासाठी अमेरिका युरोपीय देशांवर दडपण आणत असल्याचा घणाघात चीनने केला आहे.
करोनाचा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून जगभर पसरला, हा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी केलेला आरोप पूर्णतः निराधार असल्याचे वक्तव्य चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने केले आहे. चीनविरुद्धच्या आपल्या प्रचारात भारताने साथ द्यावी, अशी अमेरिकेची अपेक्षा असली, तरी भारताने याबाबत सावध भूमिका घेतली आहे. याचे कारण चीन हा आपला शेजारी देश आहे. त्याची कुरापत काढणे भारीही पडू शकते. चीनकडून आलेले काही टेस्टिंग किट्स सदोष निघाले असले, तरी भारताला त्या देशाकडून हजारो मास्क, प्रोटेक्टिव्ह गियर व व्हेंटिलेटर खरेदी करावे लागणार आहेत. अर्थात, भारताने चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीवर नियंत्रण आणले असून, त्यामुळे चीन दुखावला आहे, हे नाकारता येणार नाही. भारताची अर्थव्यवस्था चीनच्या पावपट आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात चीनवर आपण आर्थिक मात करणे अशक्य आहे. दक्षिण आशियात आपले महत्त्व वाढवण्यासाठी चीनप्रमाणेच भारतही नेटाने पावले टाकत आहे.
सार्क आपत्कालीन निधीसाठी भारताने एक कोटी डॉलर देण्याची घोषणा केली. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर भारताने मालदीवला आपले एक पथक धाडले. त्याच धर्तीवर श्रीलंका, बांगलादेश, भूतान व अफगाणिस्तानमध्येही भारतीय लष्कर “रॅपिड रिस्पॉन्स टीम्स’ धाडणार आहे. करोनायुद्ध खेळण्याच्या दृष्टीने त्या देशांच्या सर्व प्रकारच्या क्षमता वाढवण्यासाठी भारत मदत करणार आहे. या टीम्समध्ये आरोग्य व अन्य अनेक विषयांतील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. करोनाच्या निमित्ताने परराष्ट्रनीतीचा पद्धतशीर वापर करून, दक्षिण आशियाई देशांशी घट्ट मैत्री करण्याच्या दृष्टीने भारताने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. अर्थात, ही टीम पाकिस्तान व नेपाळमध्ये जाणार नाही. आजच्या विपरीत परिस्थितीतही पाकिस्तान भारतात दहशतवादी धाडत असून, हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या रियाज नायकूला सुरक्षादलांनी बुधवारी ठार मारले आहे. बुरहान वाणी जुलै 2016 मध्ये चकमकीत मरण पावल्यानंतर नायकू हा हिजबुलचा कमांडर बनला होता. मोदी सरकारने पाकिस्तानबाबत म्हणूनच कठोर धोरण पत्करलेले दिसते.
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारत-नेपाळ यांच्यातील संबंधांचे वर्णन “रोटी-बेटी का रिश्ता’ या शब्दांत केले होते. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या कारकिर्दीत चीन व नेपाळ अधिक जवळ आले आहेत. नेपाळमध्ये चीन अनेक जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. नेपाळमधील सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पार्टीतील विविध गटांतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न चीनचे तेथील राजदूत हो यांकी यांनी केला. ओली यांच्याप्रमाणेच पुष्प कमल दहाल ऊर्फ प्रचंड तसेच माधव कुमार नेपाल यांच्या त्यांनी भेटीगाठीही घेतल्या. नेपाळमधील राजकारणात थेट हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न चीनमार्फत सुरू आहे. कोविडविरोधी लढ्यात मदत करण्याचे आश्वासन देतानाच, चीनविरोधी प्रचाराच्या आघाडीत सामील न होण्याची हमीही हो यांकी यांनी नेपाळकडून घेतली. त्यापूर्वी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी नेपाळचे राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांच्याशी चर्चा केली होती. करोनाबद्दल चीन ज्या पद्धतीने गुप्तता पाळत आहे, त्याविषयी “काठमांडू पोस्ट’ने टीका केली. त्याबरोबर चीनच्या नेपाळमधील वकिलातीने या वृत्तपत्राविरुद्ध तिखट हल्ला चढवला.
करोनामुळे चीनने जगाचे नुकसान केले असून, त्याची भरपाई करण्याची मागणी एका श्रीलंकन वृत्तपत्राने केली. तेही चीनला आवडले नाही. भारतीय लष्कर श्रीलंकेत मदतपथक पाठवणार असल्याचे वृत्त आले, तेव्हा मदतीच्या नावाखाली सैनिक धाडले जात असल्याचा संशय श्रीलंकेतील प्रसारमाध्यमांतून झाला. राजीव गांधी यांच्या काळात श्रीलंकेच्या हाकेला “ओ’ देऊन भारताने तेथे लष्करी पथके तैनात केली होती. त्यामुळे तेथील प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखालील एलटीटीईचा संताप झाला होता. त्याच्याच परिणामी, राजीव गांधींची तामिळी वाघांनी निर्घृण हत्या केली. परंतु ती प्रत्यक्ष लढाई होती.
आता तर करोनाविरुद्धच्या आरोग्ययुद्धात भारत श्रीलंकेला सहकार्य करत आहे. आपत्तीच्या वेळी जो देश मदतीला धावून येतो, त्याबद्दल संबंधित देश कृतज्ञ राहतो, अशी अपेक्षा असते.
– हेमंत देसाई