कोंढवा (प्रतिनिधी) – औरंगाबाद – जालना लोहमार्गावर मालगाडीखाली 16 जण चिरडल्याच्या घटनेतून शासन, प्रशासनाचे डोळे उघडले आहेत का? असा सवाल अनाहुतपणे मुजरांकडून केला जात आहे. प्रशासानाने वेळीच घरी सोडले असते, जाण्या-येण्याची सुविधा निर्माण करून दिली असती तर हे जीव वाचले असते. पण, गरिबांच्या जीवाला किंमत नसते… म्हणून तर लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक भरडला गेला तो गरीब मजूर. दारू दुकानांना पोलीस संरक्षण अन् गावी जाण्यासाठी परवाने, असा प्रशासनाचा कारभार नक्कीच गरीब-श्रीमत अशी दरी अधिक रूंद करणारा ठरत असल्याची भावना मजुरांच्या मानात निर्माण झाली आहे.
करोनाच्या भीतीने बाहेर पडता येईना, रोजगार नाही, त्यामुळे घरात उपाशी राहण्याची वेळ आल्याने मजूर मंडळी मजल दर मजल करीत गावाकडे निघाली आहेत.नोकरी- व्यवसायानिमित्त शहराकडे आल्यानंतर गावाकडे जाण्याची ओढ वेगळीच असते. दरवर्षी गावाकडे यात्रा, जत्रा, उत्सव, लग्नसमारंभ असे कार्यक्रम असतात, त्यामुळे वर्षभरातून एकदा तरी सुट्टी घेऊन गावाकडे कामगार जातात.
लॉकडाऊनमुळे व्यवसाय, उद्योग, कंपन्या बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही, त्यातून उपासमारी होऊ लागली. बाहेर काम नाही आणि घरामध्ये किती दिवस बसून राहायचे. यातून अनेकांची गावाकडे जायची इच्छा तीव्र होत गेली. यामुळेच गेल्या पावणेदोन महिन्यापासून येथे अडकून पडलेल्या मजुराने गावाकडची वाट धरली. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी काहींनी आडमार्ग धरला. पण, असा आडमार्ग मृत्यूकडे घेऊन जातो, हे समजण्यासाठी 16 जीव जावे लागले. आता, पायी घरी निघालेले मजूर कदाचित सावध होतील. पण, प्रशासन शहाणे होणार आहे का?