येरवडा (प्रतिनिधी) – लॉकडाऊन काळात प्रशासनाकडून कुठलीही ठोस मदत मिळाल्यामुळे राज्यासह परप्रांतातील मजुरांनी आपल्या घराकडे जाण्याची वाट धरली आहे, असे असंख्य मजूर कुटुंबांसह शहरातील रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. राहण्याची सोय नाही जवळ असलेले पैसे देखील संपत असल्यामुळे आपल्या स्वतःच्या मूळ गावी जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच परिस्थितीत औरंगाबाद येथे शुक्रवारी सकाळी रेल्वे लाइनवर झोपलेल्या 16 मजुरांना मालगाडीने चिरडले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगर रस्त्याने पायी चालणाऱ्या मजुरांसाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घेत ट्रॅव्हल बसची सुविधा शुक्रवारी संध्याकाळी उपलब्ध करून दिली.
नागपूर, नांदेड, यवतमाळ पर्यंत 10 बसेसमधून सोशल डिस्टन्सचे पालन करीत 300 पेक्षा अधिक मजुरांना कुटुंबीयांसह त्यांच्या मूळगावी पाठवण्याची व्यवस्था पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केली.खांदवेनगर येथील वाघेश्वर पार्किंग या ठिकाणी खासगी बसेसमधून या मजुरांना रवाना करण्यात आले. पुणे शहरासह परिसराच्या मुख्य रस्त्यांवरून असंख्य मजूर पायी त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले आहेत.
राज्यासह सर्व राज्यातील असंख्य मजूर कुटुंबीयांसह त्यांच्या गावी जाण्यासाठी चिंतेत आहेत. शुक्रवारी दुपारपासून पुणे शहर व ग्रामीण पोलिसांच्या वेशी वरून असंख्य मजूर पायी चालले होते. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी या मजुरांना राज्याच्या नागपूर, यवतमाळ, नांदेड या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी बसेसची व्यवस्था करून दिली. प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून सोशल डिस्टन्सचे पालन करत त्यांना माफक दरात एका बसमध्ये अंदाजे 30 प्रवासी अशी व्यवस्था करण्यात आली होती. ट्रॅव्हल्स कंपनीला देखील किमान पेट्रोल, डिझेल व टोल भाडे मिळेल एवढेच शुल्क आकारण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या.
आपल्या गावी जाण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेली ही मदत पाहून परप्रांतीय मजूर भारावून गेले होते. संध्याकाळ नंतर दहा बसेस मधून 300 पेक्षा अधिक मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रवाना करण्यात आले. प्रशासनाकडून परप्रांतीय स्वराज्याच्या इतर भागातील मजुरांसाठी त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना न केल्यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच आपल्या स्वतःच्या गावी पोहोचण्यासाठी मजुरांनी मिळेल त्या दिशेने पायी गावाकडे जाण्याचा मार्ग निवडला आहे. राज्य व केंद्र सरकारने या संदर्भात तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती पोलीस प्रशासनाने यावेळी केली आहे.