शिरोमणी अकाली दल बादल घराण्याची छावणी बनला. सामान्य जनतेला हे बिलकुल रुचत नव्हते. म्हणूनच तर त्यांनी पंजाबच्या नभांगणातील बादल हटवले.
पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत 117 पैकी 92 जागा आम आदमी पक्षाने (आप) जिंकल्या. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया तसेच पंजाब सरकारमधील कॉंग्रेसचे अनेक मंत्री पराभूत झाले. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गेल्या वर्षी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन पंजाब विकास कॉंग्रेसची स्थापना केली होती. त्यांनी भाजपशी आघाडी केली पण अमरिंदर यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या पतियाळा शहर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. मात्र, या सगळ्यात धक्कादायक बाब होती, ती म्हणजे बादल कुटुंबीयांचे झालेले पानिपत.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांचा पराभव म्हणजे या कुटुंबाविषयीचा जनतेचा असंतोषच होय. त्यांचे चिरंजीव आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनाही आपटी खावी लागली. प्रकाशसिंग हे 94 वर्षांचे असून, त्यांची राजकीय कारकीर्द 75 वर्षांची आहे. आजपर्यंत त्यांनी तेरा विधानसभा निवडणुका लढवून, त्यातील अकरा जिंकल्या आहेत. प्रकाशसिंग यांनी राजकारणात 1947 साली प्रवेश केला. तसेच पंजाब विधानसभेत त्यांनी प्रवेश केला, तो 1947 सालीच. त्यावेळी ते कॉंग्रेसचे प्रचारक होते. मलौत मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून ते विजयी झाले होते. परंतु त्यानंतर त्यांनी पक्षत्याग करून अकाली दलात प्रवेश केला.
1966 साली पंजाबचे विभाजन झाले आणि प्रकाशसिंग यांनी अकालींच्या संत फतेहसिंग गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मात्र तेव्हा कॉंग्रेसच्या हरचरणसिंग ब्रार यांच्याकडून ते अवघ्या 57 मतांनी पराभूत झाले होते. 1969 पासून प्रकाशसिंग हे शिरोमणी अकाली दल (एसएडी) या पक्षातर्फे निवडणूक लढवत आले आहेत. 1995 साली ते पक्षाचे अध्यक्ष झाले आणि 2008 सालापर्यंत त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वतःकडेच ठेवली होती. त्यानंतर ही सूत्रे सुखबीरकडे आली. 1997 पासून प्रकाशसिंग हे लांबी येथून विजयी झाले आहेत. 1997 साली प्रकाशसिंग प्रथम मुख्यमंत्री बनले आणि एकूण पाचवेळा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. यावेळी मात्र “आप’च्या गुरमितसिंग खुद्दियन यांनी त्यांचा 11,396 मतांनी पराभव केला.
गुरमित हे माजी खासदार स्व. जगदेवसिंग खुद्दियन यांचे चिरंजीव होत. गुरमित हे अगोदर एसएडी मान गटात होते आणि त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेल्या जुलैत त्यांनी कॉंग्रेस सोडून आपमध्ये प्रवेश केला. परंतु त्यांच्यासारखा सामान्य नेता प्रकाशसिंग बादल यांचा पाडाव करेल, असे कोणाला स्वप्नातदेखील वाटले नाही.
मुळात प्रकाशसिंग यांनी वयाच्या नव्वदीनंतर निवडणूक लढवावी आणि राजकारणात सक्रिय राहावे, हेच आश्चर्यकारक आहे; परंतु आपल्याकडे वेगवेगळ्या पक्षांत आणि सामाजिक संस्थांमधूनही सत्तेचा आणि खुर्चीचा मोह सुटता सुटत नाही. भूतकाळातील आपल्या त्याग व सेवेच्या बळावर स्वतःसाठी नव्या पिढीला त्याग करायला लावण्याची संस्कृती इथे आहे. सतत समाजाला मार्गदर्शन करण्याचा हव्यास सुटता सुटत नाही. एकेकाळी दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे स्वरूप नेत्यांच्या वृद्धाश्रमात झाले होते. शेवटी सामान्य जनतेनेच यांना खुर्चीसकट उचलून आपापल्या घरी पाठवून दिले. एसएडीचा यावेळी इतका दारुण पराभव झाला आहे, की हा पक्ष एकेकाळी राज्यात सत्तेवर होता यावरही विश्वास बसू नये अशी परिस्थिती आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात आप हा पक्ष पाल्यापाचोळ्यासारखा उडून जाईल, अशी शेखी मिरवणाऱ्या सुखबीर यांना स्वतःचा व पक्षाचा दारुण पराभव पाहावा लागला.
“या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, मात्र हे निकाल अनपेक्षितच लागले आहेत’, असे उद्गार सुखबीर यांनी काढले आहेत. पंजाबचे अर्थमंत्री आणि सुखबीर यांचे चुलतबंधू कॉंग्रेस उमेदवार मनप्रीतसिंग बादल हेदेखील आपकडून पराभूत झाले. विक्रमसिंग मजिठिया हे सुखबीर यांचे मेहुणे. आपच्या जीवनज्योत कौर या सामान्य कार्यकर्तीने त्यांना तडाखा दिला. प्रकाशसिंग बादल यांचे जावई आदेश प्रतापसिंग कैरॉं यांचाही आपच्या उमेदवाराने पट्टी विधानसभा मतदारसंघातून पराभव केला. कैरॉं हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरॉं यांचे नातू होत. बादल यांनी शिरोमणी अकाली दलाचे रूपांतर घराणेशाहीत केले.
वास्तविक ज्यावेळी पंजाबातील राजकारणात कट्टरतावादाचा उदय झाला होता, तेव्हा प्रकाशसिंग यांनी एसएडीला नेमस्तवादाकडे नेण्याचा प्रयत्न केला होता. जनतेमधील ते अत्यंत लोकप्रिय असे नेते असून, स्वातंत्र्य चळवळीतील तसेच आणीबाणीत मिळून त्यांनी एकूण 17 वर्षे तुरुंगात काढली आहेत. “भारतीय राजकारणाचे ते नेल्सन मंडेला आहेत’, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा गौरव केला होता. परंतु कृषी कायद्याच्या प्रश्नावरून प्रकाशसिंग यांच्या सूनबाई हरसिमरत या केंद्रातून बाहेर पडल्या. याचाही एसएडीला फटका बसून, त्यांच्या पदरात विधानसभेच्या केवळ तीन जागा आल्या आहेत. त्यात सुखबीर हे पक्षाध्यक्ष बनल्यापासून हा काडर-बेस्ड पक्ष केवळ घराणेशाहीवादी पक्ष बनला. शेतकरी आणि निष्ठावंत कार्यकर्ते पक्षापासून दूर जाऊ लागले.
प्रकाशसिंग व सुखबीरसिंग बादल आणि विक्रम मजिठिया हे 2012च्या पंजाब सरकारात महत्त्वाच्या स्थानांवरील व्यक्ती होते. प्रकाशसिंग बादल हे तर मुख्यमंत्री होते. त्यावेळी आदेश कैरॉं हेही मंत्री होते. हरसिमरत कौर यांचा सुखबीर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या लगेच खासदार झाल्या आणि लगेच केंद्रीय मंत्री. आपसारखा नवा पक्ष गोरगरीब, बिनचेहऱ्याच्या पण तळमळीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन राजकारणाचे स्वरूप बदलत असताना, शिरोमणी अकाली दल मात्र कुंठितावस्थेत गेला होता. तो बादल घराण्याची छावणी बनला. सामान्य जनतेला हे बिलकुल रुचत नव्हते. म्हणूनच तर त्यांनी पंजाबच्या नभांगणातील बादल हटवले.
हेमंत देसाई