पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर कॉंग्रेस कार्यकारिणीची बहुचर्चित बैठक काल झाली. प्रसारमाध्यमांनी त्याविषयीही मोठेच वातावरण तापवले होते, पक्षात मोठे घमासान होईल आणि गांधी परिवाराच्या विरोधात बंड होईल वगैरेही संकेत दिले जात होते. पण कॉंग्रेसने त्यांच्या नेहमीच्या कसबी शैलीने सारे काही आलबेलपणे निभावून नेले. पाच तासांच्या चर्चेनंतर सोनिया गांधी यांच्याकडेच पक्षाचे नेतृत्व ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 20 ऑगस्टपर्यंत पक्षाच्या नवीन अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचेही यात ठरले.
यातून नेमके काय साध्य झाले हे कोणालाच कळले नाही. मुळात प्रश्न असा आहे की पक्षाला पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष का नाही? जर गांधी परिवारातून असा अध्यक्ष आज मिळणार नसेल तर त्यांची जेव्हा तयारी होईल तो पर्यंततरी दुसरा कोणतातरी अध्यक्ष निवडा अशी जी 23 नेत्यांची मागणी होती, त्या मागणीलाही फाटा दिला गेला आहे. वास्तविक या मागणीत काय चूक होते त्यावर कोणीही भाष्य केले नाही. देशातल्या या सर्वात जुन्या पक्षाला गेले तीन वर्षे सक्रिय अध्यक्षच नाही ही नेमकी काय भानगड आहे यावरही कोणी काही बोलत नाही.
अध्यक्षाविना पक्षाची वाताहत होत आहे ही वस्तुस्थिती लक्षात येऊनही जितके दिवस अध्यक्षांची निवड लांबविता येईल तितकी ती सतत लांबणीवरच टाकली जात आहे. यामागचे लॉजिकही लक्षात येईनासे झाले आहे. सोनिया गांधी या केवळ पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा आहेत. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणात लक्ष देता येत नाही आणि त्या प्रचारालाही जात नाहीत. पण अजून तरीही त्यांच्याच अंगावर ही जबाबदारी कायम ठेवून पक्षाने पुन्हा अध्यक्ष नेमणे टाळले आहे. या नेमणुकीसाठी वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या तारखा दिल्या गेल्या होत्या. पण प्रत्येक वेळी ही निवडणूक पुढे ढकलण्याचेच विचित्र तंत्र अवलंबले गेले. शेवटीची मुदत जून महिन्यापर्यंत होती.
30 जूनच्या आत नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले गेले होते, पण आता पुन्हा ही मुदत वाढवून ती 20 ऑगस्ट अशी करण्यात आली आहे. म्हणजे आता पुन्हा पुढील आणखी पाच-सहा महिने कॉंग्रेस नेतृत्वाशिवायच कार्यरत राहणार आहे. पराभवाचे इतके मोठे धक्के बसूनही कॉंग्रेस हा आपली स्थितीवादी भूमिका का बदलत नाही याचे आकलन भल्याभल्या राजकीय तज्ज्ञांनाही कळेनासे झाले आहे. पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेऊन पक्षाला आता पूर्णवेळ अध्यक्ष नेमा, अशी मागणी करणारे पत्र पाठवूनही पक्षाने त्यांनाच वेगळे पाडले. मुळात विषय असा आहे की, जर पुन्हा राहुल गांधी हेच पक्षाचे अध्यक्ष होणार असतील तर त्यांनी हे पद स्वीकारणे सतत टाळण्याचे कारण काय? त्यांनी आता लगेच अध्यक्ष होण्याची तयारी दर्शवली तर पक्षातून त्यांना कोण विरोध करणार आहे? मग ही हतबलता त्यांनी दाखवण्याचे कारण काय हे समजायला हवे.
राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्ष होण्याला त्या 23 ज्येष्ठ नेत्यांचाही विरोध नाही. मग राहुल गांधी यांच्याकडून हा मानभावीपणा का सुरू आहे, असा प्रश्न निर्माण होतो. आज पक्षाची सारी सूत्रे राहुल गांधीच हलवत आहेत. साऱ्या नियुक्त्या आणि निवडी त्यांच्याच संमतीने होत आहेत. म्हणजेच याचा अर्थ पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आज ते पडद्याआडून हलवत आहेत. जे काम ते पडद्यामागून करीत आहेत ते काम त्यांनी अधिकृतपणे अध्यक्ष होऊन करण्यात नेमकी अडचण काय आहे, असा प्रश्नही विचारण्यात आता अर्थ उरलेला नाही. लोकसभा निवडणुकीला आता जेमतेम दोन वर्षांचा अवधी उरला आहे. त्यात राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यात आणखी सहा महिने विलंब लावला तर त्यांना उर्वरित काळात मोदींचा दमदार पर्याय अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करणे शक्य होईल का, याचाही विचार त्यांनी करायला हवा आहे.
आज भाजपचे इतके कडवे आव्हान समोर असताना पक्षाने अशी लेचीपेची भूमिका स्वीकारणे अंतिमत: त्यांच्याच हिताचे नाही हे त्यांच्या लक्षात यायला हवे होते. आज पक्ष निर्णायकी स्थितीत असल्याने पक्षसंघटनेवर कोणाचेही नियंत्रण किंवा दबदबा उरलेला नाही. अनेक राज्यांमध्ये पक्षाला ओहोटी लागली आहे. राज्य पातळीवरच्या नेत्यांचे सगळीकडेच आउट गोईंग सुरू आहे. त्यांना थांबून ठेवणारे नेतृत्व पक्षात सक्रिय नाही. इतक्या तडाख्यांनतरही कॉंग्रेसला जाग येत नाही हेच पक्षाचे मुख्य दुखणे आहे. कॉंग्रेस पूर्ण संपणे हे देशाच्या हिताचे नाही असे आज अन्य पक्षांचेच लोक सांगू लागले आहेत. कॉंग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी होणे आणि भाजपला समर्थ पर्याय देणे हे महत्त्वाचे काम केवळ कॉंग्रेसमुळेच रखडून राहिले आहे.
कॉंग्रेसला वगळून अन्य प्रादेशिक पक्षांची आघाडी निर्माण होणे अशक्य असल्याचे कॉंग्रेसचे नेते उच्चारवाने सांगतात. तर मग त्यासाठी ते प्रत्यक्ष प्रयत्न कधी सुरू करणार याविषयीही आज सारेच अंधारात आहेत. ही स्थिती शोचनीय आहे. निवडणुकीत यश मिळो ना मिळो, पण आज कॉंग्रेस पक्ष पूर्णवेळ सक्रिय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मोदींशी दोन हात करायला सिद्ध आहे असे चित्र निर्माण झाले तरच लोक कॉंग्रेसचा पुन्हा विचार करू शकतात. पण कॉंग्रेसला तेही करायचे नसेल तर मग त्यांना कोण वाचवणार. कालच्या बैठकीत म्हणे सोनिया गांधी आणि खुद्द राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व सोडून देण्याची तयारी दाखवली होती.
पण पक्षातील साऱ्याच नेत्यांनी एकमुखाने त्यांचा हा प्रस्ताव फेटाळला. हा प्रकार या आधीही अनेकवेळा होऊन गेला आहे. कालच्या पाच राज्यांतील दारुण पराभवानंतरही पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती कार्यकारिणीच्या बैठकीत झाली आहे. ही “जैसे थे’ स्थितीच कायम ठेवण्यामागचे नेमके इंगित कधी उलगडणार आहे, हा अनेकांचा प्रश्न आहे. कॉंग्रेसला जागे करण्याचे प्रयत्न अन्य पक्षांच्या नेत्यांनीही करून पाहिले तरीही कॉंग्रेस हलताना दिसत नाही.