अकोले -सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर राजूर ते संगमनेरपर्यंतचे व इतर गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे आदेश आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.
ना. तनपुरे हे संगमनेर येथे आले होते. मुंबईला रवाना होतांना त्यांनी अकोले मार्गे जाणे पसंत केले. यावेळी त्यांनी तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक घेतली. वादळ, झालेले नुकसान व खंडित वीजपुरवठा याची माहिती घेतली. तातडीने गट तयार करून गावोगावी पोल उभारणी व्हावी व हे काम युद्ध पातळीवर दोन दिवसांत पूर्ण करावे, असा आदेश दिला.तसेच सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना विविध कामांचे तपशील घेत पुढील सूचना दिल्या.
या वेळी आ. डॉ. किरण लहामटे, तहसीलदार मुकेश कांबळे, मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्ञानेश्वर काकडे, महावितरणचे ज्ञानेश बागूल, महावितरणचे राजूर विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी, संदीप शेणकर, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, युवक तालुकाध्यक्ष रवींद्र मालुंजकर, युवक शहराध्यक्ष अमित नाईकवाडी, राजेंद्र कुमकर, महेशराव तिकांडे आदी उपस्थित होते.