कविता शेटे
सांगली – प्रशासनाकडून मिरज रेल्वे स्थानकावरून रविवारी श्रमिक एक्स्प्रेस सोडण्यात आली. ती मंगळवारी उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथे पोहचणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशमधील परप्रांतीयांनी “जय महाराष्ट्र’ च्या घोषणा देत आनंद व्यक्त केला. साधारण 50 दिवसांपासून देश लॉकडाऊन आहे. तेव्हापासूनच परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ आली.
येथील सर्व उद्योगधंदे बंद झाल्याने हाताला काम नाही. अशावेळी त्यांना घराची ओढ लागली होती. अखेर रविवारी रात्री आठ वाजता श्रमिक एक्सप्रेस गोरखपुरकडे रवाना झाली आणि यावेळी परप्रांतीयांमध्ये असणारे महाराष्ट्राविषयीचे प्रेम आणि आदर दिसून आला. मातृभूमी महाराष्ट्र नसली तरीही वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहून त्यांच्या नसानसांत मराठीच वाहत असल्याचे चित्र दिसले.
सांगली जिल्ह्यात उत्तर प्रदेश, बिहार येथून अनेक लोक रोजगारासाठी येत असतात. मिळेल ते छोटे- मोठे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. औद्योगिक वसाहती, खाद्यपदार्थाचे गाडे किंवा बांधकाम व्यवसाय या सर्वच ठिकाणी हे लोक दिवसरात्र राबताना दिसतात. मिळालेल्या पैशांतून काही पैसे घराकडे पाठवून उरलेल्या तुटपुंज्या पैशात ते आपला उदरनिर्वाह करतात.
त्यांच्या स्वतःच्या गावी रोजगाराची पर्याप्त साधने उपलब्ध नसल्याने ते महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांमध्ये स्थलांतर करतात. या ठिकाणी विविध व्यवसायांमध्ये त्यांनी चांगला जम बसवला असल्याचे पाहायला मिळते. परंतु, करोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे बंद झाले. रोजगाराची साधने संपली. यामुळेच या उपासमारीचा सामना करण्यापेक्षा गावी जाऊन कुटुंबासह राहणे या लोकांनी पसंत केले.
जनता कर्फ्यू 22 मार्च रोजी लागू झाला. तेव्हापासून साधारण दीड महिन्यांपासून देशाबरोबरच जिल्ह्यातीलही सर्वच व्यवहार ठप्प झाले. परप्रांतीय मजूर काम करत असलेल्या ठेकेदारांची कामेही थांबली. त्यामुळे या ठेकेदारांकडून मजुरांना मिळणारा मोबदला बंद झाला. ठेकेदारांकडून मजुरांना पैसे मिळणे तर लांबच पण दोन वेळच्या जेवणाचे काय करत आहात, याची साधी विचारपूसही या मालकवर्गांने केली नाही. शिवाय त्यांनी या परप्रांतीयांना असेही सांगितले की येथे काम मिळणे आता अवघड आहे, आपली पावले घराकडे वळवा.
याबरोबरच केलेल्या कामाचे पैसेही मजुरांना दिले गेले नाहीत. याआधी केलेल्या कामाचे जे काही पैसे मिळाले होते. त्या पैशांवर या लोकांनी साधारण पन्नास दिवस कसाबसा उदरनिर्वाह केला. पण तेही पैसे आता संपले होते. शिवाय परतीच्या वाटाही बंद झाल्या होत्या. रेल्वे, बस सेवा बंद होत्या. अशावेळी या परप्रांतीयांना फक्त घरी जाण्याची आस लागली होती.
महाराष्ट्र शासनाने परप्रांतीयांना परत आपल्या गावी जाण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारता त्यांच्या परतीची सोय फुकट केली असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होते. गावी गेल्यानंतर काही दिवस चांगले जातीलही पण त्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न हा त्यांच्यासमोर उभा असणार आहे. रोजगाराची साधने त्यांना त्यांच्या राज्यात उपलब्ध नसल्याने हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.