खोडद (मंगेश पाटे) – लॉकडाऊनमुळे जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची कामे दीड महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहेत. केंद्र सरकारने खासदार निधी दोन वर्षे बंद केला आहे. त्यामुळे आगामी दोन वर्षांत प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांचा डोंगर उभा राहणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
जुन्नर तालुक्यातील खोडद, मांजरवाडी, ठाकरवाडी, सावरगाव, पूर्व तसेच पश्चिम आदिवासी भागातील कामे अनेक ठेकेदारांनी सुरू केलेली होती. बऱ्याच रस्त्यांवर खडी येऊन पडलेली होती. साकव पुलांसाठी खड्डे खोदले होते. काही गावांमध्ये व सोसायट्यांमध्ये सांडपाणी जाण्यासाठी ड्रेनेज लाइनची गटारे खोदलेली होती; परंतु लॉकडाऊनमुळे ही कामे बंद होऊन हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. ठेकादारांची मशिनरी जागेवरच उभी आहेत. खडी विखरून खड्डे पडली आहे. ड्रेनेज लाइनसाठी खोदलेले मातीचे ढीग पडून आहेत. रात्रीच्यावेळी छोटे- मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. मांजरवाडी रोडवरील नवीन पूल बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नाल्याचे व गटाराचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे सध्या राज्य सरकारने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. अर्धवट रस्त्यांची कामेही सुरू करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी ग्रामीण भागातील ठेकेदार व नागरिक करीत आहेत.
खासदार, आमदार निधी कपातीला कात्री
केंद्र सरकारने खासदारांना मिळणाऱ्या निधीला दोन वर्षे कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांच्या बाबतीत गतिरोधक निर्माण झाला आहे. ही कामे भविष्यात दोन वर्षे तरी होणार नाहीत, अशी चिन्हे दिसत आहेत. लॉकडाऊननंतर आर्थिक व्यवहार लवकर पूर्वपदावर आल्यानंतर वर्षभरात कपातीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता आहे. मात्र, तूर्तास विकासकामांना “ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे अनेक गावांतील समस्या लोकप्रतिनिधींकडे मांडणाऱ्या स्थानिक नेत्यांची गोची झाली आहे.