सोलापूर – राज्यात अस्मानी संकट आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच सोलापूरमध्ये ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतापले आहेत. संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथील इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली.
ऊसाच्या एफआरपीची रक्कम न मिळाल्यामुळे सोलापूरमधील ऊस उत्पादक शेतकरी कमालीचे संतापले आहेत. साखर कारखान्यांकडून एफआरपी रक्कम मिळत नसल्यामुळे शेतकरी काही दिवसांपासून आंदोलने करत आहेत. या आंदोलनानंतरही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयात घुसून शेतकऱ्यांनी कार्यालयातील साहित्याची नासधुस करत कार्यालयातील काचेच्या दरवाजाची तोडफोड करत रोष व्यक्त केला.
इंद्रेश्वर साखर कारखान्याने मागील पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावातील इंद्रेश्वर साखर कारखान्याला टाळे ठोका आंदोलनासाठी शेतकरी गेटवर बसले आहेत.