बीड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजाविले आहे. 2008 सालच्या एका प्रकरणात जामीन मिळूनही सतत तारखेला न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे. मात्र याप्रकरणी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या प्रकरणाच्या तारखेला न्यायालयात सतत ते सातत्याने गैरहजर राहिले आहेत. यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे.
मुंबई येथे 22 ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरे यांना अटक झाली होती, याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. परळीत देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या अटकेचा निषेध केला. यादरम्यान, कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसवर धर्मापुरी पॉइंट येथे दगडफेक केली. दगडफेकीत बसच समोरील काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.