नवी दिल्ली – पुढच्या निवडणुकीत आम्ही पोस्टर लावणार नाही. चहापाण्याच्या खर्चासाठी पैसे देणार नाही. तरीही जनता आम्हाला विजयी करेल असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
एका हिंदी वाहिनीच्य मंचावर बोलताना गडकरी म्हणाले की मीही एक राजकीय नेता आहे व मी पण निवडणूक लढतो. यावेळी मी साडेतीन लाख मतांनी लोकसभेवर निवडून गेलो. आता पाच लाख मतांनी विजयी होईल. हा माझा अहंकार नसून कामाच्या विश्वासावर मी हे बोलतो आहे. जनता मालक आहे, मी विश्वस्त आहे. मी कोणी साधु सन्यासी नाही. मात्र लोकांसाठी काम व्हायला हवे. अगोदर केवळ आपले पाहत होतो, कुटुंबाचे पाहत होतो. आता समाज आणि देशासाठी काम करतो आहे.
ते पुढे म्हणाले की मी आमच्या लोकांना सांगितले आहे, पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही, चहा पाजणार नाही, नास्टा खाउ घालणार नाही, तुम्हाला मत द्यायचे तर द्या. कोणतेही आमिष दाखवून मी मत मागणार नाही. मी काम केले आहे त्यावर मला मते मिळतील. हिंदुंची मते मिळतील मुसलमानांचीही मते मिळतील. मी मुस्लिम समुदायाच्या एका कार्यक्रमात गेलो होतो. तेथेही मी म्हणालो मी आरएसएसवाला आहे.
नंतर पश्चाताप करू नका. पण सगळे माझ्यासोबत आहेत. कारण काम करताना मी भेदभाव केला नाही. गुजरातमधील विजयाबाबत बोलताना ते म्हणाले की आम्ही जेव्हा सत्तेत असतो तेव्हा विकासाचे राजकारण करतो. चांगले रस्ते, पाणी, वीज, दळणवळणाची सुविधा, कृषि, आरोग्य, शिक्षण अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही विक्रम केला आहे.
गुजरातच्या जनतेला विकास पाहायला मिळाला म्हणूनच गेल्या 27 वर्षांपासून ते आम्हाला निवडून देत आहेत. त्याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातची जनता आम्हाला पाठिंबा देते आहे. हिमाचलमधील पराभवाबाबत बोलताना ते म्हणाले की कॉंग्रेस आणि आम्हाला मिळालेल्या मतांमध्ये अगदी थोडासा फरक आहे. नशिबाची साथ मिळाली नाही, एवढेच मी म्हणेन. 1-2 टक्के जादा मते मिळाली असती तर आमचे सरकार आले असते.
वजन कमी केल्याचेही सांगितले गुपित
कधी नितीन गडकरी यांचे वजन 135 किलो होते. ते आता 89 झाले आहे. त्याचे श्रेय ते योग, प्राणायम आणि व्यायामाला देतात. आपण रोज एक तास वेगवेगळ्या प्रकारचा प्राणायम करतो. सकाळी लवकर बाहेर जायचे असले तरी प्राणायम करतोच. त्यामुळे आरोग्य सुधारले आहे. प्रतिकार शक्तीही वाढली. रोज सायंकाळी 7 वाजता विचार करतो की आज कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचे. दिल्लीत भरपूर हॉटेल्स आहेत आणि मी सगळीकडे जाऊन आलो आहे. मी शुध्द शाकाहारी आहे. खाण्याच्या बाबतीत माझ्यात काहीच बदल झालेला नाही. खाण्याचे प्रमाण मात्र कमी केले आहे असे गडकरी म्हणाले.