औरंगाबाद, – राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडून अद्याप कोणीही संपर्क साधलेला नाही असे एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. त्यांना आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे ओवेसी यांनी नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले एआयएमआयएम पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेत दोन सदस्य आहेत.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी सध्या महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये जोरदार चुरस आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता या दोन मतांना विशेष महत्त्व आले आहे.
एआयएमआयएमची सोमवारी नांदेडमध्ये बैठक झाली, परंतु पक्षाने महाविकास आघाडी किंवा भाजपला पाठिंबा देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा नको असेल तर ठीक आहे. आम्ही आमच्या आमदारांशी त्याबाबत बोलत आहोत. एक-दोन दिवसांत त्या विषयी निर्णय घेऊ असेही ओवैसी यांनी सांगितले.
या पक्षाचे खासदार इम्प्तियाज जलील यांनी म्हटले आहे की महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आमच्याशी स्पष्टपणे तसे बोलले पाहिजे.