नवी दिल्ली – जगातील कोणतीही शक्ती भारतीय लष्कराला लडाख भागात गस्त घालण्यापासून रोखू शकत नाही, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत केले. सीमेवरील तणावाबाबत राज्यसभेतील सदस्यांनी स्पष्टीकरण मागितले होते. त्याला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी हे प्रतिपादन केले.
गेल्या काही महिन्यांपासून सीमेवर घडलेल्या चकमकी आणि तणावाची स्थिती प्रामुख्याने लडाखच्या भागात गस्त घालण्याच्या मुद्द्यावरून झाले आहे. मात्र ही गस्त घालणे परंपरागत आणि स्पष्ट सूचित केलेली क्रिया आहे.
या भागात भारतीय सैनिकांना गस्त घालण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. भारतीय सैनिकांनी याच कारणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
प्रत्यक्ष ताबारेषेवर चीनने आपल्या सैन्याच्या चिथावणीखोर कृत्याच्या आधारे गेल्या महिन्यात ‘जैसे थे’ स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या वक्तव्यात आणि कृतीमध्ये विसंवाद आहे. सीमेवरील मुद्द्याबाबत भारताला शांततामय मार्गाने तोडगा हवा आहे. मात्र देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत भारत मागे राहणार नाही, असेही राजनाथ सिंह यांनी जोर देऊन सांगितले.
सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून मुत्सद्दी आणि लष्करी चर्चा सुरू आहे. चिनी सैनिकांनी 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पुन्हा एकदा चिथावणीखोरपणे पॅन्गोंग तलावच्या साऊथ बॅंक भागात ‘जैसे थे’ स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.
मात्र याही वेळी भारताच्या सशस्त्र दलांनी ‘एलएसी’वर ठाम प्रतिकार केला आणि चिनी सैनिकांचा हल्ला परतवून लावला. चिनी सैन्याच्या उक्ती आणि कृतीमध्ये भेद आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.