नीरा – मुंबईमध्ये वाढता करोनाचा प्रभाव पाहता मुंबईमधील अनेक चाकरमानी गावाकडे येत आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मुंबई, पुणेकरांना आता साताऱ्यात प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे साताऱ्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रवासाचा ऑनलाइन परवाना अत्यावश्यक आहे. पास नसणाऱ्या व्यक्तींना सातारच्या सीमेवरून माघारी पाठवले जात आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेवर “नो, पास एंट्री’चा फलक चाकरमान्यांना गतिरोधक बनला आहे. प्रशासनाकडून काटेकोर पालन केले जात आहे.
करोनाच्या सुरुवातीच्या काळात सातारा जिल्हा मात्र ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, मुंबईहून आलेल्या काही बधितांमुळे ही साथ साताऱ्याच्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत पसरली आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने परवानगीशिवाय येऊ नये, असा आदेश काढला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी नीरा, सारोळा, सांगवी नीरा नदीकाठच्या पुणे- सातारा सीमेवर तपासणी करून विनापासधारक प्रवाशांना तिथूनच माघारी पाठवले जात आहे.
त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्याच्या सीमा पार करून सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे विनापास सातारामध्ये जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपले आपल्या कुटुंबाचे हाल करून घेणे असेच होऊन बसले आहे. अनेकांना चेक नाक्यावरूनच पुन्हा माघारी मुंबईकडे जावे लागत आहे. त्यातच सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यात येण्यासारखे पुरंदर, बारामतीमधील काही चोरवाटा मुंबईकरांनी वापरले होते. ते मार्गही पोलिसांनी बंद
केले आहेत.
महा-ई- सेंटरवर गर्दी
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोणालाही कामानिमित्त प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे, असा लोकांचा समज आहे. मुंबईहून सातारा सीमेपर्यंत येईपर्यंत कोणताही अडथळा येत नाही. पुणे जिल्ह्यात सहज प्रवेश मिळतो. मात्र, सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
सातारा सीमेवरून माघारी पाठवलेले अनेकजण पुणे जिल्ह्यातील सीमा भागातील गावांत ऑनलाइन पास काढण्यासाठी कॉम्प्युटर सेंटर, महा- ई- सेवा सेंटर शोधताना दिसत आहेत. त्यामुळे या लोकांचा गावातील लोकांशी संपर्क येत आहे. त्यामुळे पुरंदरमधील नीरा, पिंपरे आदी गावांमध्ये करोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
लोकांनी आपली गैरसोय होऊ नये म्हणून शासनाचा प्रवास परवाना घेऊनच सातारा जिल्ह्यात यावे. विनापरवानाधारक कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यांना नीरानजिक पाडेगाव चेक नाक्यावरून माघारी पाठवले जाईल.
– संतोष चौधरी,
पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, लोणंद.