पुणे – टोळधाडीचे संकट विदर्भावर पुन्हा घोंगावत असल्याने खरिपाच्या तयारीत गुंतलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्याची हद्द ओलांडत टोळधाड भंडाऱ्यात दाखल झाली. मंगर्ले आणि पिठेसूर या गावांमध्ये दाखल झालेल्या टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशातून अमरावती, नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यांत गेल्या पंधरवड्यात दाखल झालेल्या टोळधाडीने नाशिक, नगरच्या सीमेपर्यंत धडक मारली होती. त्यानंतर ही टोळधाड पुन्हा मध्य प्रदेशात परतली होती. त्याकरिता कृषी विभागाकडून व्यापक प्रयत्न करण्यात आले. कृषी आयुक्तालय स्तरावरून फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करण्यात आले. याचदरम्यान टोळधाड मध्य प्रदेशात गेल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु, आठवडाभरानंतर टोळधाड पुन्हा विदर्भात दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांची चिंतादेखील वाढीस लागली आहे.
खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. काही भागांत पाऊस पडल्यानंतर पेरणीचे कामही झाले. काही भागात पीक अंकुरल्याने अशा पिकाचा फडशा टोळधाड पाडण्याची भीती वर्तविली जात आहे. परिणामी संपूर्ण खरीप हंगामावर टोळधाडीचे सावट निर्माण झाले आहे.