पुणे- हवेली तहसील कार्यालयात प्रलंबित असलेले कामकाज आणि जमीन अपिल (केसेस) करण्याच्या दृष्टीने दुपारी 3 नंतर नागरिकांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भेटण्यास मनाई केली आहे. याबाबतचा फलक कार्यालयाबाहेर लावला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
हवेली हा तालुका भोगौलिक दृष्ट्या खूप मोठा आहे. तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख ठिकाण हे तहसील कार्यालयात असते. त्यामुळे येथे नागरिकांची सदैव गर्दी असते. ती टाळण्यासाठी स्वतंत्र पर्याय शोधण्याऐवजी हवेली प्रशासनाने अजब तर्क लावत दुपारी 3 नंतर सर्वसामान्यांना कार्यालयात प्रवेश बंदी आणली आहे.
सकाळच्या वेळेत नागरिकांना कार्यालयात येणे शक्य होतेच असे नाही. अशा नागरिकांना दुपारनंतरची वेळ सोयीची ठरते. तीननंतर कार्यालयात प्रवेश मिळत नसल्याने नागरिकांना कार्यालयाच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे.
ज्या कर्मचारी व अधिकारी यांना भेटायचे आहे, त्यांना फोन करायचा किंवा बाहेर असलेल्या शिपाईकडे चिठ्ठीवर नागरिकांनी आपला मोबाइल नंबर, नाव आणि ज्या अधिकारी व कर्मचारी यांना भेटायचे आहे ते लिहून द्यायचे. ती चिठ्ठी संबंधित व्यक्तीकडे जमा करण्यात येईल, असे तिथे उपस्थित असलेल्या शिपाईकडून उत्तर दिले जाते. या निर्णयाबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हवेली तहसील :कार्यालयात दुपारी 3 नंतर नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. तसा फलक तेथे लावला आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी होत आहे.