पीपल्स रिपब्लिकनचा इशारा : हाथरसप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध
देहूरोड – भाजपच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कोणतेही उपाययोजना किंवा संरक्षण देत नाही. बेटी बचाव, देश बचाव असा नाराच लावतात त्यामुळे आता कॅंडल मोर्चा नाही, योगी सरकारच्या विरोधात सॅंडल मोर्चा काढावा लागेल, असा इशारा गौसिया शेख यांनी दिला. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या कॅन्डल मार्चदरम्यान त्या बोलत होत्या.
हाथरस येथील पीडिताला न्याय मिळावा, यासाठी पीआरपीच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अमिन शेख यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला.
मेन बाजारपेठेतून मोर्चा चौकात आल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. बोर्डाचे माजी उपाध्यक्ष शेख, गौसिया शेख, जिल्हा सचिव अरुण जगताप, शहराध्यक्ष परशुराम दोडमनी, कार्याध्यक्ष रजाक शेख, युवाध्यक्ष कयूम शेख, कॉंग्रेसचे गफूर शेख आदीनी सरकारचा निषेधार्थ घोषणा देत मनोगत व्यक्त केले.
यावेळी मेणबत्ती प्रज्वलित करीत मृत पीडित तरुणीला श्रद्धांजली अर्पण करताना पोलीस मित्र संघटनेचे आयूब शेख, राजू कागडा, संदीप भुंम्बक, मौलाना अबुल कलाम वेल्फेअरचे हाजी रसूल गुलाम, अहमद पिरजादे, जुबेर सय्यद, प्रशांत येळवंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
पीडितेला न्याय मिळावा यासाठी हा तपास महाराष्ट्र पोलीसांकडे देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
अमिन शेख म्हणाले, योगी सरकारच्या काळात अशा निंदनीय घटनेत वाढ होत आहे. योगी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओच्या घोषणा देण्यात आल्या. अरुण जगताप म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमध्ये समान अधिकार आहे. योगी सरकारच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असे अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमांना त्वरीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे.