पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती बनण्याची इच्छा होती, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला. मात्र, तो दावा बोगस असल्याची प्रतिक्रिया नितीश यांनी दिली. नितीश यांनी भाजपबरोबरचे संबंध तोडल्याने बिहारमध्ये सत्ताबदल झाला. त्यानंतर भाजप नेत्यांकडून नितीश यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. सुशील यांनीही नितीश यांच्यावर निशाणा साधला.
नितीश यांना उपराष्ट्रपतिपद हवे होते. मात्र, भाजपने ती आकांक्षा पूर्ण न केल्याने नितीश यांनी संबंध तोडले, असे सुशील यांनी म्हटले. मात्र, तो दावा नितीश यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना फेटाळून लावला. सुशील यांचा दावा म्हणजे मोठा विनोदच आहे. ते म्हणतात तशी माझी कुठली आकांक्षा नव्हती. आमच्या पक्षाने (जेडीयू) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला, असे ते म्हणाले.
सध्या सुशील यांच्याकडे कुठले महत्वाचे पद नाही. माझ्या विरोधात बोलण्याने ते मिळेल असे त्यांना वाटत असावे. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. मला त्याचा कुठलाच त्रास जाणवणार नाही, असा शाब्दिक टोलाही नितीश यांनी लगावला.