पाटणा – संयुक्त जनता दलाला केंद्रीय मंत्रिमंडळात जादा प्रतिनिधित्व दिले जावे, या मागणीसाठी मोठा आग्रह धरणारे या पक्षाचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आता या प्रकरणात नरमाईची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराविषयी पंतप्रधान जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना नमूद केले. या विषयावर भाजपशी चर्चा करण्यासाठी आम्ही आरसीपी सिंह यांच्यावर जबाबदारी सोपवली असून, ते सध्या दिल्लीत आहेत, असेही नितीश कुमारांनी सांगितले.
संयुक्तजनता दलाला केवळ नाममात्र प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्रिमंडळात देण्याची भूमिका भाजपने घेतली होती, त्याला नितीश कुमारांनी उघड विरोध केला होता. पण आता राजकीय परिस्थिती बदलली आहे.
बिहारमध्ये कमी जागा असूनही संयुक्त जनता दलाला भाजपने मुख्यमंत्रीपद दिले असल्याने त्यांनी आता केंद्रीय मंत्रिमंडळातील भूमिकेबद्दल ही नरमाईची भूमिका घेतली आहे, असे सांगण्यात येते.