Bihar Politics – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी साथ सोडल्यानंतरही त्यांच्यासाठी दरवाजे नेहमीच खुले असल्याचे वक्तव्य राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केले. मात्र, त्या वक्तव्याला महत्व देण्याचे नितीश यांनी टाळले.
मित्रपक्षांच्या आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी मी चांगले संबंध ठेवतो. त्यांची भेट झाल्यावर मी हस्तांदोलन करतो.त्यामध्ये काहीच विशेष नाही.कोण काय म्हणतो याचा विचार मी करत नाही, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
नितीश यांनी राजदबरोबरचे संबंध तोडल्यानंतर त्यांची नुकतीच लालूंशी भेट झाली. त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. त्याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर लालूंनी नितीश यांच्याविषयी मनात कटूता नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून सूचित केले होते.
पुन्हा राजकीय कोलांटउडी मारत नितीश यांनी नुकतीच भाजपशी पुन्हा मैत्री केली. त्यामुळे बिहारमध्ये सत्ताबदल घडला. राजद, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश असणाऱ्या महाआघाडीला त्या राज्याच्या सत्तेतून बाहेर पडावे लागले. तर, नितीश यांचा जेडीयू, भाजप आणि इतर पक्षांचा समावेश असणाऱ्या एनडीएचे सरकार सत्तेवर आले.