नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयावर घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. द्वारका एक्स्प्रेसवेवर कॅगच्या रिपोर्टवरुन केंद्र सरकारविरोधात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना त्यांनी, ‘द्वारका एस्क्प्रेसवेसंबंधी घोटाळ्याच्या बातम्या खोट्या आहेत. उलट द्वारका एक्स्प्रेसवेवर १२ टक्के पैसे वाचवण्यात आले आहेत असल्याचे म्हटले आहे.
संसदेत १० ऑगस्ट रोजी कॅगचा रिपोर्ट सादर करण्यात आला होता. यामध्ये द्वारका एक्स्प्रेसवेच्या निर्माण कार्यात अधिकचे पैसे खर्च करण्यात आल्याचे म्हटले होते. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून निवडणुकीच्या तोंडावर त्यांना चांगला मुद्दा मिळाला आहे. नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आरोपाचे खंडन केले.
याविषयी बोलताना,रिपोर्टमध्ये सांगितलेले मुद्दे योग्य नाहीत. द्वारका एस्क्प्रेसवे २९ किलोमीटर अंतराचा असल्याचं सांगण्यात आलंय. आम्ही जो कॅबिनेट नोट पाठवली होती त्यात लिहिलं होतं की आम्ही पाच हजार किलोमीटरचा टू लेन रोड बनवू आणि त्याची किंमत ९१ हजार कोटी रुपये असेल. यात फ्लायओव्हर आणि रिंगरोडची किंमत इस्टिमेटेड डीपीआर बनल्यानंतर ठरवण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
तसेच मुद्दा असा आहे की कॅग ज्याला २९ किलोमीटर म्हणत आहे, तो २३० किलोमीटरचा एस्क्प्रेसवे आहे. यात ६ टनेल आणि ५६३ किमी एकूण लेनचा रोड आहे. जो टेंडर निघाला होता तो २०६ कोटी रुपये प्रति किलोमीटर साठी होता. त्यामुळे आम्ही या प्रोजेक्टवर १२ टक्के कमी खर्च केला आहे. गडकरी म्हणाले की, आमच्या अधिकाऱ्यांनी हा मुद्दा कॅगसमोर ठेवला होता. चर्चेमध्ये कॅग अधिकाऱ्यांनी ही गोष्ट मान्य केली होती. पण, आमच्याकडून चूक झाली की आम्ही ही गोष्ट त्यांना लिखितमध्ये दिली नाही.
मीडियासह विरोधकांना सांगू इच्छितो. आम्ही टाईम बाऊंड आहोत, रिझल्ट ओरिएंटेड आहोत आणि भ्रष्टाचार मूक्त आहोत. या सरकारमध्ये मी ५० लाख कोटींचे कामं केली आहेत. एकाही कामामध्ये कोणताही कत्रांटदार किंवा अन्य कोणी म्हणत असेल की एक रुपयाही द्यावा लागला असेल तर मी म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.