मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानहीउपस्थित होते. या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले असून त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. केजरीवाल यांनी बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, उद्धव ठाकरे त्यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे तेदेखील वाघच आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. मातोश्रीवर या दोन नेत्यांची भेट झाली. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरेंना न्याय देईल अशी अपेक्षा असल्याचा विश्वास यावेळी केजरीवाल यांनी व्यक्त केला.
आधी मुंबई बॅाम्ब स्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले.आता खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांला भेटतात.यावरून हेच सिद्ध होते जन्माने संपत्तीत वारसा मिळतो पण आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही.@OfficeofUT
— nitesh rane (@NiteshNRane) February 25, 2023
यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे, नितेश राणे म्हणाले की, आधी मुंबई बॅाम्ब स्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले. आता खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांला भेटतात. यावरून हेच सिद्ध होते जन्माने संपत्तीत वारसा मिळतो पण आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, राज्यात घडत असणाऱ्या राजकीय घडामोडीत अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट ही अत्यंत महत्वाची मानली जात आहे. अरविद केजरीवाल यांनी या भेटी दरम्यान, ‘उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झाली आहे, त्यांच्या पक्षाचं चिन्ह चोरीला गेलं, त्यांच्या पक्षाचं नाव चोरीला गेलं, त्यांचं जे काही होतं, ते सगळं चोरी करून नेलं, पण मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते. उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र यांच्याबरोबर आहे हा मला विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून यांना संपूर्ण न्याय मिळेल अशी आशा मला आहे. येत्या प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरेंना भरगोस यश मिळेल, असं मला वाटतंय असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
या भेटीनंतर महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी याविषयी सूचक विधान केले आहे. अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
भाजपाला गुंडगिरीशिवाय काही येत नाही, यामुळे देश पुढे जाणार नाही. दिल्लीतील जनतेनं आम्हाला बहुमत दिलं, तरीही दिल्लीत महापौर बसवायला आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं असं केजरीवाल म्हणाले. या देशात एकच पक्ष आहे जो २४ तास निवडणुकीबद्दल विचार करतो असं सांगत केजरीवाल यांनी भाजपाला टोला लगावला. आम्ही देशाच्या विकासाच्या मुद्द्यांवर विचार करतो असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.