मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक युद्ध काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी जनआशीर्वादच्या माध्यमातून चांगलेच वातावरण निर्माण केले होते. परंतु ही यात्रा संपून काही दिवस उलटले नाहीत तोवर जिल्ह्यातील राणे समर्थक २ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करुन नारायण राणेंना धक्का दिला आहे. याच मुद्द्यावरून आता नितेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेवकांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे. आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केल्याचे भाजपा नगरसेवकांनी सांगितले.
आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच..
यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा" !! @CMOMaharashtra @uddhavthackeray— nitesh rane (@NiteshNRane) September 2, 2021
मात्र भाजपा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर आमदार नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. नितेश राणे ट्विटमध्ये म्हणतात की, आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच. यालाच म्हणतात “येड्यांची जत्रा” अशा शब्दात नितेश राणेंनी उदय सामंत आणि वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर केलेल्या विधानानंतर शिवसैनिकांनी राणेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत आंदोलन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणेंनी शिवसेनेला इशारा दिला. नितेश राणे म्हणाले होते की, आपल्या देशाचा अपमान होत असताना भारतीय नागरिक गप्प बसतील का? एका मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव की हिरक महोत्सव विचारावं याविरोधात तो संताप आहे.
आमच्या घरावर जी मुलं पाठवली. आम्ही कुणीही नव्हतो तेव्हा ते सगळे घरावर आहे. पण आता ती वैयक्तिक लढाई त्यांनी केली. आमच्या घरात मुलं होतं. उद्या जर काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं? आमच्या वडिलांना शिव्या घालताना आम्ही विरोध करायचा नाही का? मग तुम्ही जी भाषा वापरता ती आम्ही वापरली तर ते चालत नाही. सुरुवात त्यांनी केली पण आता व्याजासह प्रत्युत्तर आम्ही देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला होता.