पुणे- पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना “इकोफ्रेंडली’ मूर्तींपासून ते निर्माल्याच्या नियोजनापर्यंतचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. मूर्तींबाबत महापालिका जनजागृती करत आहेच; परंतु निर्माल्याबाबतही “स्वच्छ’ संस्थेच्या सहकार्याने महापालिकेने “निर्माल्यातून निसर्गाकडे’ हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये “कमिन्स इंडिया’नेही यंदा सहभाग नोंदवला आहे.
या उपक्रमांतर्गत कचरा वेचकांनी दारोदार जात नागरिकांकडून निर्माल्य वेगळे गोळा करण्यास सुरूवात केली आहे. मोठ्या प्रमाणात कचऱ्यापासून वेगळे गोळा झालेले निर्माल्य नैसर्गिकरित्या जिरवण्याचे काम महापालिका करणार आहे.
गणेशोत्सवात भाविकांनी वाहिलेल्या फुले, हार, दुर्वा यांसारख्या नैसर्गिकरित्या जिरवल्या जाऊ शकणाऱ्या निर्माल्याचे योग्य मार्गाने विघटन व्हावे आणि भाविकाच्या श्रद्धेला तडा जाऊ न देता पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या हेतूने पुणे शहरात मागील 11 वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य संकलन केले जात आहे. यामध्ये “स्वच्छ’ संस्थेचे कचरा वेचक नागरिकांकडून निर्माल्य गोळा करतात आणि मनपाच्या गाड्यांकडे पुढील प्रक्रियेसाठी देतात. कमिन्स इंडियाच्या माध्यमातून निर्माल्य गोळा करण्यासाठी लागणारी पोती कचरा वेचकांना उपलब्ध करून दिली जातात.
शहराचे सांस्कृतिक महत्त्व जपण्याबरोबरच शहराच्या पर्यावरणाचे देखील संवर्धन “निर्माल्य टू निसर्ग’ सारख्या उपक्रमातून जपण्याचे काम स्वच्छचे कचरा वेचक नागरिकांच्या सहकार्याने करत आहेत. यावर्षी हा उपक्रम रविवारपासून (दि. 12) सुरू झाल्याची माहिती “स्वच्छ’ संस्थेचे ऑपरेशन्स हेड आलोक गोगटे यांनी दिली.
पूर्वी कचरा वेचक नदीकाठी थांबून निर्माल्य गोळा करत असत; परंतु सध्याच्या करोना च्या परिस्थितीमुळे दारोदारी जात हा उपक्रम राबवण्यात कचरा वेचकांना मोठे यश मिळाले आहे. दि. 15 आणि 20 सप्टेंबरला हे संकलन होणार असून, नागरिकांनी वेचकांकडे निर्माल्य सुपूर्त करावे असे आवाहन “स्वच्छ’ तर्फे करण्यात आले आहे.
निर्माल्यामध्ये थर्माकोल टाकू नका…
निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश असावा. त्यामध्ये प्लॅस्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मूर्ती किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. हे प्रासादिक निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवून शेतकऱ्यांना देण्यात येते. म्हणूनच या प्रासादिक निर्माल्याचे पावित्र्य भंग पावेल अशा कुठल्याही वस्तू किंवा इतर कचरा निर्माल्यात टाकू नये, असे आवाहनही या निमित्ताने “स्वच्छ’ संस्था, महापालिका यांनी केले आहे.