वाल्हे -करोना महामारीचे संकट असल्याने सर्व पालखी सोहळे पायी जाण्याचा निर्णय शासनाने रद्द केला आहे. आद्य कवी रामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींच्या संजीवनी समाधी मंदिर असलेल्या श्रीक्षेत्र वाल्हे (ता. पुरंदर) येथून महर्षि वाल्मिकी यांचा पंढरपूरकडे जाणारा पायी पालखी सोहळा रद्द केला आहे.
मात्र, यंदा आषाढी एकादशीची वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी वाल्मिकी ऋषींच्या पादुकांना दुचाकीवरून नीरा नदीवरील दत्तघाटावर घेऊन जात हभप माणिक महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र नीरा नदी स्नान घालण्यात आले. पवित्र नीरा स्नानानंतर दुचाकीवरूनच ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली आणि नंतर पादुकांना वाल्मिकी मंदिरामध्ये ठेवत सरकारी नियमांचे पालन करीत पादुकांची विधीवत पूजा करून भजन व आरती करण्यात आली.
यावेळी हभप माणिक महाराज पवार म्हणाले, करोना महामारीमुळे यावर्षी आषाढी वारीला पंढरपूरला जाता आले नाही, यांचे दुःख संपूर्ण वारकरी सांप्रदायाला आहे. आम्ही शरीराने जरी येथे असलो, तरी मनाने मात्र पंढरपूरला आहे; आमचे विठ्ठलाचे साकडे आहे, करोना महामारी संकट आपल्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर, जगातून लवकर जाऊ दे आणि वैष्णवांचा मेळा पुन्हा पंढरपूरला जमू दे. या वर्षी वारीला जाता आले नाही तरी प्रत्येकाच्या हृदयी विठ्ठलरूप आहे.
यावेळी महर्षि वाल्मिकी संजीवनी समाधी मंदिरामध्ये सोहळा व्यवस्थापक ज्ञानेश्वर भुजबळ, विणेकरी काकडे महाराज, पकवाज वादक प्रथमेश शिंदे, मंदिराचे पुजारी बबन भुजबळ, विलास भुजबळ, बाळासाहेब साळुंखे, मच्छिंद्र भुजबळ, ज्ञानेश्वर कुदळे आदी वैष्णव उपस्थित होते.