भोर -भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरण आज (दि. 6) सकाळी 6 च्या सुमारास शंभर टक्के भरले असून धरणाच्या पाच दरवाजांतून 1 हजार 483 क्युसेकने, तर पॉवर हाऊसमधून 750 क्युसेकने पाणी सोडण्यात आले
असल्याची माहिती धरण प्रशासनाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर आणि दिगंबर डुबल यांनी दिली. धरणातून सध्या 2 हजार 232 क्युसेकने नीरा नदीत पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. 6) सकाळी सहा वाजता धरणातील पाच दरवाजांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली, ती दुपार 12 वाजेपर्यंत सुरू होती.
मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे आता तीन दरवाजातून हा विसर्ग सुरू असल्याचे धरणावर प्रत्यक्ष भेट दिली असता पाहायला मिळाले.
धरणाचे बॅकवॉटर 25 कि. मी. पर्यंत पसरलेले असून, शुक्रवारी (दि. 6) धरण क्षेत्रात 10 मि. ली. मीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत 1782 मी. मी.पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी 24 ऑगस्टला नीरा-देवघर धरण 100 टक्के भरले होते.
मागील वर्षाच्या तुलनेत धरण 18 दिवस लवकर भरले आहे. आज रोजी भाटघर धरण 85.49 टक्के, वीर धरण 91.10 टक्के आणि गुंजवणी धारण 95.45 टक्के भरले आहे.
यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला आणि भाटघर धरण क्षेत्रापेक्षा नीरा-देवघर धरण क्षेत्रात यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे धरण लवकर भरले.
या धरणाचे पाणी पुणे जिल्ह्यातील भोर, सातारा जिल्हातील फलटण, खंडाळा आणि सोलापूरमधील माळशिरस आदी दुष्काळी तालुक्यातील बागायती शेतीसाठी उपयोगात आणले जाते.
रोज 6 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू
हे संपूर्ण धरण मातीचे असून, धरणाला 12 बाय 5 मीटरच्या पाच सिमेंटच्या मोऱ्यांतून पाणी सोडले जाते. 11.91 टीएमसी क्षमता असलेल्या नीरा-देवघर धरणावरील वीजनिर्मिती केंद्र शुक्रवारपासून सुरू करण्यात आले असून, त्यासाठी 750 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वीजनिर्मिती केंद्रातून दररोज 6 मेगावॅट वीजनिर्मीती सुरू झाली आहे.
जलाशयाचे पूजन
जलसंपदा विभागाचे अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता दिगबंर डुबल, शाखा अभियंता परमानंद गोसावी, उपअभियंता चव्हाण यांच्यासह सर्जेराव लोखंडे, किसन चंदशिव, सुभाष यादव, संतोष कंक यांच्या हस्ते जलाशयास साडी चोळी, श्रीफळ अर्ण करून जलाशयाचे पूजन करण्यात आले.