दावडी – खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा (ता. खेड) येथील नवीन पुलावरुन घरी जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यामध्ये आझाद नारायण गाडे (वय 38, रा. खरपुडी खुर्द) असे वाहून गेलेल्या या तरुणाचे नाव आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणाचा उशिरा पर्यंत शोध लागला नाही. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आझाद नारायण गाडे हा कामावरून घरी येत होता. खरपुडी येथे बंधाऱ्याच्या लगत नवीन झालेल्या पुलावरून पाणी वाहत असताना तो जात होता. पुलावरून पाणी वाहत असताना स्टंटबाजी करत तो वाहत्या पाण्यातून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
स्थानिक ग्रामस्थांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. गेले दोन ते तीन दिवस तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच ओढ्या नाल्यांना पूर आले आहेत त्यामुळे चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नदीला मोठा पूर आला असताना. अशावेळी केलेली स्टंटबाजी तरुणाच्या जीवावर बेतली आहे.