सातारा (प्रतिनिधी) : कातरखटाव येथून चालत निघालेल्या जवळपास पंचवीस युवकांना कातरखटावकरांनी आपली माणुसकी दाखवून त्यांची भूक भागवली. या बाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या करोना विषाणूचा प्रसार होवू नये म्हणून संपुर्ण भारतात संचारबंदी लावण्यात आली आहे. अचानक झालेल्या या संचारबंदीमुळे परगावी असलेल्या युवकांचे हाल होत आहेत. असेच काही युवक पुण्यावरून व फलटणवरुनचालत त्यांच्या गावाकडे चालत निघालेले आहेत. त्यांना कर्नाटकमधील बेळगाव व हुबळी येथे जायचे आहे.
पुणे बेंगलोर हायवे पुर्णपणे बंद असल्याने या युवकांनी मोबाईलवरील रोडमॅप व्दारे हा मार्ग शोधून काढत गावाकडच्या दिशने मजल दरमजल सुरू केली आहे. मात्र, सगळंच बंद असल्याने त्यांना गेली तीन दिवस काहीही खायला मिळाले नाही. हे आज सकाळी कातरखटावमध्ये हे युवक आल्यानंतर एक युवक बिस्कीटचे पुडे घेण्यासाठी गावात आला.
त्यावेळी त्याला ग्रामस्थांनी विचारणा केली. तेव्हा “आम्ही पुणे व फलटण येथे शेती प्रशिक्षण घेत आहोत, सर्व केंद्रे बंद झाल्याने आम्हाला घरी जाण्याशिवाय पर्याय उरला नाही” त्यामुळे बेळगावकडे चालत निघाल्याचे त्याने सांगितले. युवकांची ही अवस्था पाहून कात्रेश्वर ग्रुपने सर्वाना ड्रायफुड व पाणी दिले. तसेच सरपंच तानाजी देशमुख व बादशाही धाबा यांच्या व्यवस्थापनाने सर्वांना जेवण दिले.