वारजे/पुणे (एकता जाधव) – पुणे महानगरपालिकेत वारजे-माळवाडी परिसराचा समावेश होऊन 22 वर्षे झाली. तरी देखील वारजे मध्ये ग्रामपंचायत काळातील स्मशानभूमीच अस्तित्वात आहे. या ठिकाणी कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. स्मशानभूमीतील स्वच्छतागृह तर मोडलेल्या स्थितीत आहे. यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाण्याचा प्रवाह सोडल्यानंतर ही स्मशानभूमी पाण्याखाली जाते, अशा वेळी ससून किंवा वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
वारजे परिसराची लोकसंख्या अंदाजे 1 लाख 30 हजार पेक्षा अधिक आहे. या भागात तीन झोपडपट्ट्या आहेत. हा दाट वस्तीचा भाग असल्याकारणाने, वाढती लोकसंख्या लक्षात घेता, वारजे स्मशानभूमी अद्ययावत व सुसज्ज करणे जरूरी आहे.
शिवणे-वारजे-रामनगर हा भाग वारजे माळवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येतो. प्रभागाचे क्षेत्रफळ (चौ. किमी) 3.05 आहे. प्रभागाची लोकसंख्या 50647 आहे. प्रभागातील झोपडपट्टीचे क्षेत्रफळ 1731.31 चौ. मी. आहे. तरीही स्मशानभूमी सारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी होत असताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांची कामेही पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
दोन वर्ष करोना कालावधीतच गेले. वारजेमध्ये रामनगर सारखी वस्ती असल्याकारणाने तेथे ड्रेनेज लाइनची खूप मोठी समस्या आहे. परिसर खूप मोठा आहे. पण, त्या तुलनेत निधी कमी आहे. मी प्रत्येक वेळी माझ्या भागा करीता जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करत असते. तसेच पुढच्या निधीमध्ये वारजे स्मशानभूमीसाठी तरतूद करून ते काम मार्गी लावण्यात येईल.
– सायली वांजळे, नगरसेविका, राष्ट्रवादी
स्मशानभूमी नदीपात्रात असल्याने त्या जागेत काही सुधारणा केल्या तरी त्या पाण्याचा प्रवाहामुळे तेथे दुरवस्था होते. याकरीता कुस्ती संकुला शेजारी उद्यानाचे आरक्षण पडले आहे. तरी त्यामधील चार,पाच गुंठे जागा स्मशानभूमीसाठी काढून तेथे अत्याधुनिक विद्युत दाहिनीची व्यवस्था असावी, अशी मागणी मी आयुक्तांकडे यापूर्वीच केली आहे. याबाबत मी पाठपुरावा करीत आहे.
– सचिन दोडके, नगरसेवक, राष्ट्रवादी
वैकुंठ स्मशानभूमी किंवा कोथरूड स्मशानभूमी ही लोकसंख्या वाढल्यानंतर ज्याप्रमाणे अत्याधुनिक करण्यात आल्या त्याप्रमाणे वारजे मध्येही पूर्ण शहरीकरण झाले आहे. लोकसंख्येच्या अनुषंगाने अद्यावत व विद्युतदाहिनी अशी स्मशानभूमी असायला हवी. अंत्यविधी करायला खूप लोक येतात, त्याकरीता स्मशानभूमीला पार्किंगची ही सोय असावी.
– पराग ढेणे, सामाजिक कार्यकर्ते
एकीकडे खराडी-शिवणे मार्ग आणि दुसरीकडे नदीपात्र अशी स्थिती असल्याने वारजे मध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही. शिवणे, कोंढवे-धावडे यादेखील स्मशानभूमी एकाच मार्गावर असल्याकारणाने अधिक पावसाळ्याच्या काळात किंवा खडकवासला धरणातून पाणी सोडल्या वैकुंठ स्मशान भूमी शिवाय पर्याय राहत नाही.
– सचिन बराटे, कॉंग्रेस, कार्यकर्ते
वारजे स्मशानभूमीला मूळ हक्काची जागाच नाही. आता असलेली स्मशानभूमी ही ग्रामपंचायत काळातील आहे. वारजे स्मशानभूमीसाठी हक्काची जागा हवी.
– किरण बारटक्के, भाजप, कार्यकर्ते