वाघोली (प्रतिनिधी) : पुणे शहराचा उपनगरीय भाग म्हणून ओळखला जाणारा परिसर वाहतूक कोंडीने भरलेला पहावयास मिळत असे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लागू केल्यानंतर जवळपास २ लाख लोकसंख्या असणाऱ्या वाघोली मधील नागरिकांनी स्वतः हून या कर्फ्यु ला सहकार्य केल्याने गर्दीने गजबजलेल्या वाघोलीच्या अनोख्या दर्दीची ओळख पुन्हा एकदा परिसराला झाली आहे.
पुणे नगर रस्ता आज पूर्णपणे मोकळा असल्याचा अनुभव आला आहे. लोणीकंद पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या आवाहनास नागरिकांनी पूर्ण पाठींबा देत सगळी दुकाने बंद केली होती. याशिवाय घरी थांबून या कर्फ्यू ला पाठिंबा दिला.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळपास 21 गावांमध्ये सर्वत्र शांतता सुव्यवस्था ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे. नागरिकांनी आपली सर्व कामे या दिवशी घरी बसून केली. सोशल मीडियावर आपल्या आपल्या भागातल्या शांतता व सुव्यवस्थेचा आढावा नागरिकांनी एकमेकांना दिला.