नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने आज मध्यरात्रीपासून 31मार्चच्या मध्यरात्री पर्यंत सर्व प्रवासी रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व प्रकारच्या प्रिमियम ट्रेन, मेल एक्सप्रेस, पॅसेंजर, उपनगरी आणि मेट्रो रेल्वे सेवा तसेच कोकण रेल्वेसाठी लागू होईल.
मात्र उपनगरी रेल्वे आणि कोलकाता मेट्रो सर्व्हीसेस आज मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. कोरोनाच्या आजच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कोरोना साथीला आटोक्यात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पहाटे चार वाजेपर्यंत इच्छित स्थळी पोहोचणाऱ्या रेल्वेना इच्छित स्थानकापर्यंत पोहोचण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरू टेवण्यासाठी मालगाड्यांची वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. 31 मार्चपर्यंतची सर्व तिकीटे रद्द करणाऱ्यांना त्यांचा पूर्ण परतावा देण्याची तयारी रेल्वेने दाखवली आहे.