रावणगाव -गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय, नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने मुंबई, पुणे तथा अन्य शहरात वास्तव्यास असणारी गावाकडील अनेक कुटुंबे करोनाच्या धास्तीने दौंड तालुक्यातील रावणगाव आणि नंदादेवी या आपल्या मूळगावी पुन्हा माघारी आले आहेत. अशा बाहेरून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी रावणगाव आणि नंदादेवी या गावातील नागिकांनी रावणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार रावणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने तातडीने अशा बाहेरून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन करोनाच्या पार्श्वभूमीवर 69 नागरिकांची तपासणी करण्यात आली. परंतू या सर्वच नागरिकांमध्ये घसादुखी, ताप, सर्दी, कोरडा खोकला अशी कोणतीच लक्षणे दिसून न आल्याने त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यापैकी सात-आठ रुग्णांना थोडाफार सर्दी, खोकला असल्याने त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले.
रावणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अशा बाहेरून आलेल्या नागरिकांवरती लक्ष असून शहरातून गावात आलेल्या नागरिकांची लगेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सध्या मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये गेलेल्या नागरिकांनी करोनाच्या धास्तीमुळे पुन्हा गावाकडचा रस्ता धरल्याने इतर नागरिक खबरदारी म्हणून त्यांच्यापासून थोडे दूरच राहणे पसंत करीत असल्याचे चित्र गावाकडे पहावयास मिळत आहे.
- बाहेरच्या शहरातून गावाकडे आलेल्या एकाही नागरिकांमध्ये प्राथमिक तपासणीत करोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. तरी सुध्दा गावातील सर्व नागरीकांनी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी.
– डॉ. अपर्णा शिंदे,
वैद्यकीय अधिकारी रावणगाव. - करोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या शहरातून रावणगाव परिसरात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची प्राथमिक तपासणी करण्याचे आदेश रावणगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आले आहेत . त्यांची तपासणी केल्यामुळे गावातील नागरिकांनी चिंता करू नये.
– शिवाजी आटोळे,
सरपंच ग्रामपंचायत रावणगाव.