मुंबई – प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्यांना नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती किंवा उद्या सांगतीलही की प्रताप सरनाईकांना नातू झाला तर आधी इथे घेऊन या.
हे सगळे काय आहे? ही विकृतीच आहे, असे विकृत राजकारण आम्ही करत नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर पलटवार केला.
महाराष्ट्रात सरकारविरोधात काही बोलले तर तुरुंगात टाकले जाते, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे असा आरोप फडणवीस यांनी केला होता, त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी सवाल केला, ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात?
मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, ही चांगली गोष्ट आहे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.