मुंबई – विविध देशांच्या सरकारी रोख्यांवरील परतावा वाढत आहे. त्याचबरोबर महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे कमॉडिटीजच्या किमती गेल्या आठवड्यापासून वाढत आहेत. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी शेअरीची तुफान विक्री केली. तोच प्रकार भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी केला त्यामुळे शुक्रवारी शेअर बाजाराचे निर्देशांक पावणेतीन टक्क्यापर्यंत कोसळले.
यामुळे गुंतवणूकदारांचे अतोनात नुकसान झाले. शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेस 3.80 टक्क्यांनी म्हणजे 1,939 अंकानी कोसळून 49,099 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्ससंबंधीत सर्व 30 कंपन्याच्या शेअरच्या भावात घट झाली. काही आठवड्यांपूर्वी हा निर्देशांक 52 हजारांवर गेला होता.
विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी 568 अंकांनी कोसळून 14,529 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स 50 हजारांच्या खाली गेल्याबद्दल आणि निफ्टी 15 हजाराच्या खाली गेल्याबद्दल गुंतवणूकदारांनी खंत व्यक्त केली.
ओएनजीसी, महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, ऍक्सीस बॅंक, कोटक बॅंक, पावर ग्रीड, एचडीएफसी, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यानी आज सपाटून मार खाल्ला. सर्वात जास्त नुकसान वित्तीय क्षेत्राचे झाले.
20 जानेवारी रोजी सत्ता ग्रहण केल्यानंतर अमेरिकेच्या ज्यो बायडेन प्रशासनाने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर नकारात्मक कृती केली आहे. काल अमेरिकन हवाई दलाने सीरियामधील काही ठिकाणी हवाई हल्ले केले. याचा जागतिक शेअर बाजारावर परिणाम झाला. याचा संसर्ग भारतीय शेअर बाजारांनाही झाला असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
या महिन्यात आतापर्यंत क्रूडच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के क्रुड आयात करतो. त्याचबरोबर भारतामध्ये इंधनाचे दरही वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय शेअर बाजारावर इंधन दरवाढीचा परिणाम होत असल्याचे काही ब्रोकर्सनी सांगितले.