मुंबई – तब्बल 100 दिवसानंतर शिवसेना खासदार संजय राऊत जेलमधून बाहेर आले आहेत. त्यांची अटक बेकायदा असल्याचे निरीक्षण नोंदवत पीएमएलए कोर्टाने राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवास्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन भाजप सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा साधला.
संजय राऊत यांनी यावेळी म्हटले की, महाराष्ट्रात शिवसेना एकच आहे, गट वगैरे काही नाही. शिवसेना एक कुटुंब आहे. उद्धव ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील. या विश्वासामुळे मी तुरुंगाच निश्चिंत होतो. शिवसेनेसाठी मला 10 वेळा जरी तुरुंगात जावे लागले तरी मी जाईन. पक्षासाठी काही करण्याची संधी मिळाली तर मागे पुढे पाहणार नाही. पक्षाने मला गेल्या 40 वर्षांत भरभरुन दिल आहे. पक्षाशी बेईमानी करणार नाही. स्वत:ची सुटका करायची म्हणून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत हा शिवसेना नेता आहे, खासदार आहे, सामनाचा कार्यकारी संपादक आहे आणि माझा जिवलग मित्र आहे. मित्र तोच असतो, जो संकटाच्या काळात न डगमगता लढतो. संकटासोबत राहून संजय लढतोय. काल न्यायालयाच्या निकालामुळे सगळे स्पष्ट झाले आहे. मी न्यायदेवतेचे आभार मानतो. या निकालात न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे हे स्पष्ट झाले आहे. बेकायदेशीरपणे केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरु आहे. संजय राऊत तोफ आहेत. तोफ-तोफच असते. या तोफेचा पल्ला तुम्हाला माहित आहे, असा मिश्कील टोला ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.