मुंबई – अनेक दिवसांच्या वाद-विवादानंतर अखेर आज न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, बीएमसीमधील जागा एकनाथ शिंदे गटाला देण्यात आली होती. तेव्हाच मी म्हटलं होतं की आता शिवाजी पार्कची जागा ठाकरे गटाला द्यावी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली आहे. ही परंपरा शिवसैनिकांना हवी आहे. शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे आहेत.
कॉंग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, शिवसेनेला दसरा मेळाव्याला उच्च न्यायालयाकडून मिळालेली परवानगी शिंदे-फडणवीस सरकारचा मुखभंग आहे. शासन द्वेष, तिरस्कार आणि सूडाने करायचे नसते हा धडा यातून ते शिकले तर त्यांच्यासाठीच बरे होईल.
भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगीच मिळाली ना ?? मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमले म्हणून जल्लोष करत असतील.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले, आता प्रश्न मिटला आहे. उद्धव ठाकरे आणि सगळ्यांचा आग्रह होता परवानगी मिळायला पाहिजे. शेवटी त्यांना ते मिळाले. बिकेसी ग्राउंडपण मोठं आहे. कोणी इकडे घ्या, कोणी तिकडे जा.
शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे म्हणाले, आपण लोकशाही मानणारे आहोत आणि व्यक्तिगत विचारल्यास माझ्या मनासारखे झाले. शिवाजी पार्कची मर्यादा 50 हजारांची आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मुंबईतील सगळ्यात मोठ्या मैदानात मेळावा घेवू. मुंबईत नसेल ठाण्याला पाहू ठाण्यात नसेल तर मी नाशिकला पाहतो.
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरै म्हणाले, हा राज्यभरातील कोट्यवधी शिवसैनिकांचा विजय आहे. आई जगदंबेच्या कृपेने हा न्याय मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह कोट्यवधी शिवसैनिकांचा हा विजय आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खूप छळले, न्याय दिला नाही. परंतू न्यायपालिकेने अखेर न्याय दिला.
भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले, मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयाला जे योग्य वाटले तो त्यांनी निकाल दिला. मी यावर बोलणार नाही. मुंबई पालिकेचे प्रशासन कारभार म्हणून काम करते. कायदा सुव्यवस्था निर्माण होईल म्हणून पालिकेने ते मत मांडले. कायदा सुव्यवस्था हातळली जाईल कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस उत्तर देतील.
शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेचा हा विजयादशमी मेळावा अनेक वर्षे शिवतीर्थावर होतो. कधीही असे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न तयार झालेले नव्हते. आतापर्यंत असणाऱ्या प्रथा परंपरांमध्ये अनेक वर्षांपासून “एक मैदान, एक नेता’ या भूमिकेतून शिवसेनचे असणारं सातत्य आणि आम्ही नियमाप्रमाणे अर्ज केलेला आहे. त्याचा विचार करून त्यानुसार उच्च न्यायालयाने अत्यंत निरपेक्षपणे निर्णय दिलेला आहे.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यापासूनच ठामपणे सागंत होते, की आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच साजरा करण्यास आम्हाला परवानगी मिळेल, अशी खात्री होती, आत्मविश्वास होता. आज हा आमचा आत्मविश्वास खरा ठरलेला आहे.