मुंबई – लोकसभा निवडणुकीपूर्वी युती आवश्यक आहे, हे भाजपच्या लक्षात आल्यानंतर अमित शहा “मातोश्री’वर गेले आणि मनाने दुभंगलेली युती पुन्हा एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरली. युतीने लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा कलगी-तुरा रंगायला लागला.
तुमची ताकद कमी झाली आहे, हे शिवसेनेला सांगायची एकही संधी सोडायची नाही, असे भाजपचे बहुधा ठरले होते, असे म्हणत शरद पवार यांनी भाजप शिवसेनेला कसे डावलत होती, कमी लेखत होती हेच सांगितले.
भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व अर्थात नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून आणि विधानांतून शिवसेनेविषयी फारशी सहानुभूती नसल्याचेच प्रतीत होत होते. शिवसेनेच्या मात्र भाजपकडून अपेक्षा पूर्वीप्रमाणेच कायम होत्या. हे निरीक्षण आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे.
शरद पवार यांचे “लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेची सुधारीत आवृत्ती 2 मे रोजी प्रकाशित होत आहे. 2015 ते आतापर्यंतचा वादळी कालखंड चितारणारी ही सुधारीत आवृत्ती असल्याचे या पुस्तकाच्या मुखपृष्टावरच लिहिण्यात आले आहे. त्यावरुनच हे पुस्तक 2019च्या निवडणूक निकालाआधी आणि नंतरचे अनेक खुलासे करणारे ठरणार असल्याचा अंदाज आहे.
यात पवारांनी म्हटले आहे, शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागांतून तिचे उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात निर्विवाद वर्चस्व स्थापन करता येणार नाही, असा सरळ राजकीय हिशेब भाजपचा होता. याच्यामुळे आपल्या अस्तित्वावर भाजप उठला आहे. याविषयी शिवसेनेच्या नेतृत्वात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्यातही तीव्र संताप होता. सत्तेत एकत्र असल्यामुळे त्याचा उद्रेक झाला नाही; परंतू आग धुमसत होती.