मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 1999 पासून वारंवार सांगितले आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. मात्र असे असले तरी राष्ट्रवादी पक्षाच्या नशिबात मुख्यमंत्री पदाचा योग कधीही आला नाही, अशी टीका भाजपचे नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर केली आहे. राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
मुख्यमंत्रीपदावर रोज नवीन दावेदारी पाहायला मिळत आहेत. यात माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदावर केलेले वक्तव्यामुळे चर्चांना उधान आले आहे. पाटील यांनी यापुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असेल असा दावा केला आहे. त्यावर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, जयंत पाटलांना हे माहीत आहे की 1999 पासून राष्ट्रावादी पक्षाने वारंवार सांगितले आमचा पक्ष सर्वांत मोठा आहे. आता राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देईन. मात्र स्थापनेपासून त्यांच्या नशिबात तसा योग आलेला नाही. हा योग जनता ठरवत असते, नेते नाही. स्वतःच्या पक्षाचा कौतुक करण्याचा सर्वांना अधिकार आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, असेही ते म्हणू शकतात, मात्र मला तरी त्यांच्या पक्षाचा योग दिसत नाही.
शिंदेंचे मुख्यमंत्री राहणार- भुमरे
जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा मंत्री संदिपान भुमरे यांनीही समाचार घेतला. ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाटील सतत म्हणत असतात की आता राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार. मात्र त्यांनी हे लक्षात घ्यावं की सध्या राज्यात युतीतील पक्ष सर्वात मोठे आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये युतींचेच प्राबल्य असेल. त्यामुळे युतीचीच सत्ता स्थापन होईल. त्यानंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही.